
मुंबई ः मुंबईतून केवळ स्थलांतरीत मजूरच निघालेले नाहीत, तर मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार असलेल्या टॅक्सी, रिक्षाही गावाकडे निघाल्या आहेत. मुंबईतून दोन हजार टॅक्सी, रिक्षा बाहेर पडल्या असल्याचे सांगितले जात आहे. इंदूरला पोहोचलेल्या काही रिक्षा चालकांनी 40 हजार रिक्षा मुंबईबाहेर पडल्याचा दावा केला.
लॉकडाऊनमुळे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस रिक्षा, टॅक्सी चालकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातील काही ट्रकने तर काही आपल्याच रिक्षा, टॅक्सीतून निघाले आहेत. या टॅक्सी तसेच रिक्षांना बृहन्मुंबई क्षेत्राबाहेर वाहन नेण्याचा परवाना नाही, पण त्यांनी मार्ग काढला आहे. ते केवळ मुंबईबाहेर गेलेले नाहीत, तर त्यातील अनेकांनी महाराष्ट्राची सीमाही पार केली आहे. आता त्यांना परवाना दिला तर ते आपल्या गावाकडे अधिकृतपणे जाऊ शकतील अशी मागणी केली जात आहे.
मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालक हे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील आहेत.
मुंबईत वीस हजार काळी - पिवळी टॅक्सी तसेच दोन लाख रिक्षा आहेत, असे काही अभ्यासकांनी सांगितले, तर काहींच्या मते हीच संख्या 45 हजार आणि पाच लाख आहे. आता आपल्या रिक्षा, टॅक्सीने कुटुंबियांनी गावाला जाण्याचे ठरवले, तर मुंबईत टॅक्सी, रिक्षांची चणचण निर्माण होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. आता केवळ हे कोणी सांगत नाही तर इंदूर येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अनेक मुंबईत नोंदणी झालेल्या रिक्षा दिसत आहेत.
मुंबईत काही खायला मिळत नाही. कोणत्याही छोट्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. प्रसंगी भीक मागावी लागते, त्यामुळे माझ्या रिक्षातूनच निघालो, असे विनोद गिरी याने सांगितले. विनोद त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह साकीनाकाला रहात होता आणि रिक्षा चालवत होता. घरातील सर्व सामान घेऊन तो रिक्षाने निघाला आहे. उत्तर प्रदेशात नोकरी मिळाली, तर मुंबईत जाणार नाही असेच त्याने सांगितले. त्याच्यासह असलेल्या अनेकांनी धंदाच बंद असल्याने घराचे भाडेही देता येत नव्हते, असा दावा केला.
काहींनी मुंबई सोडल्यापासून महाराष्ट्रात काहीही खायला मिळाले नाही, पण मध्य प्रदेशात आल्यापासून खायला मिळत आहे तसेच काही रिक्षा चालक पेट्रोल, डिझेलसाठीही मदत करीत असल्याचे इंदूरमधील माध्यमांना सांगून मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. काही रिक्षा चालकांनी सरकार तर सोडाच आमच्या संघटनांनीही मदत केली नाही असा आरोप केला.
इंदूरपर्यंत पोहोचलेल्या या अनेक मुंबईतील रिक्षा चालकांना उत्तर प्रदेशातील आपल्या गावी पोहोचण्यास अजून दोन दिवस लागतील. त्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात रहावे लागेल, पण त्याची चिंता नाही. त्यानंतर नक्कीच गावात घेतील, याची त्यांना खात्री आहे. मुंबईत भीक मागण्यापेक्षा गावात जाऊन शेती केलेली कधीही चांगली असे ते सांगतात.
महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांसाठी काहीही केले नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांवर भुके मरण्याची वेळ आली आहे. संघटनांनी काही मदत केली, पण मुंबईत रिक्षांची संख्या अफाट आहे. संघटना तरी किती पुरी पडणार, सरकारने रिक्षा चालकांना किमान दहा हजार रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे, पण त्याचा निर्णय झालेला नाही, अशी खंत रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.