मुंबई : मुंबईतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत; मात्र वर्गात फक्त २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास या विद्यार्थ्यांचे एका दिवसाआड वर्ग भरवावेत, असा निर्णय आज पालिकेने घेतला आहे. तसेच शाळेत कोविड नियमावलीचे पालन होत आहे की नाही याची अचानक भेटी देऊन पाहाणी करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या सर्व शाळांचे शनिवारपर्यंत (ता.२) निर्जुंतुकीकरण होणार आहे. खासगी शाळांनीही निर्जुंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही स्वच्छ करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली आहे; तर कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी वर्गात फक्त २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. आवश्यकता असल्यास एक दिवसाआड प्रवेश देण्यात येणार आहे.
शाळा सुरू झाल्यावर मुले एकत्र खेळणार नाहीत, डब्बा खाणार नाहीत, याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापौरांनी आज पालिका शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांशी संवाद साधला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.