मुंबई - घाटकोपरमधील विमान दुर्घटनेची सीबीआयमार्फत (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी याबाबत सीबीआय आणि हवाई वाहतूक मंत्रालयाला नोटिसा बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
मुंबई विमानतळाजवळील उंच इमारतींविरोधात याचिका करणारे यशवंत शेणॉय यांनी ही याचिका दाखल केली आहे. या अपघातात वैमानिकासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यूवाय एव्हिएशन कंपनीचा परवाना रद्द करावा, संचालक दीपक कोठारी यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.
खराब हवामानात टेस्ट फ्लाइट करणे जोखमीचे असते. अशा वेळी या विमानाने उड्डाण का केले, याची चौकशी झाली पाहिजे. या कंपनीचा "सेफ्टी रेकॉर्ड' अत्यंत खराब आहे. कंपनीकडून विमान, हेलिकॉप्टरची योग्य देखभाल होत नाही. यापूर्वीही दुर्घटनेसारखी स्थिती निर्माण होऊन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा व्यक्तींबाबत कंपनी हलगर्जी करत असेल, तर इतरांबाबतही बेफिकिरीची मानसिकता कंपनीकडून अवलंबली जात असावी, असा संशय घ्यायला वाव आहे. डीजीसीएने हे विमान टेस्ट फ्लाइटसाठी सक्षम असल्याचे प्रमाणित केले होते; परंतु त्यादरम्यान अपघात झाल्याने डीजीसीएने परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली नसल्याचे दिसते. त्यामुळे हे प्रमाणपत्र देणाऱ्या डीजीसीए अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, असे मुद्दे याचिकेत आहेत.
|