मुंबई - मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्रशासन चूक करत असेल तर त्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे. पालिकेचा कारभार पारदर्शक असावा, अशी शिवसेनेचीही भूमिका आहे, असे मत शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी येथे मांडले.
भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपलोकायुक्त आणि माजी सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात, महाडेश्वर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी उपलोकायुक्त नेमण्याचा निर्णय घेतला. तो चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. हा निर्णय स्वागतार्ह आहे. शिवसेना पारदर्शकतेच्या मुद्द्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल, असे वाटत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला महापौरपदासाठी उमेदवारी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणे ही आता माझी जबाबदारी आहे. शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्यामुळे शिवसेनाच जिंकणार हे निश्चित आहे, असेही महाडेश्वर म्हणाले.
महापौरपदाच्या निवडणुकीतील महाडेश्वर यांचा मार्ग मोकळा झाल्यात जमा आहे. महाडेश्वर नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
|