मुंबई - शहराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून पुस्तकांच्या सहवासात निवांत क्षण मिळवण्यासाठी हक्काचे 'पुस्तकांचे गाव' साताऱ्यातील भिलार या गावी वसविण्यात आले आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन होणार आहे.
पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे पाच किलोमीटरवर भिलार हे गाव आहे. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आले आहे. हे देशातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. तावडे यांनी सांगितले की, पुस्तकांबरोबर एक दिवस तरी पर्यटकांनी घालवावा, या गावातल्या कुठल्याही कोपऱ्यात, झाडांच्या सावलीत कवितांच्या वाचनाचा अनुभव त्यांना मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. मराठीबरोबरच लवकरच काही दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही येथे ठेवण्यात येतील. या निसर्गरम्य गावात "स्वत्व' या स्वयंसेवी गटाच्या सुमारे 75 चित्रकारांनी 25 ठिकाणे आपल्या कलेद्वारे सजवली आहेत.
पुस्तकांचे गाव नेमके कसे आहे, हे शाळेतील मुलांनाही कळावे यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेची सहल येथे आणावी, असे आवाहन शाळांना करण्यात येणार आहे.
|