मुंबई - 'आम्ही मॉन्सूनसाठी सज्ज आहोत,' अशा शब्दांत मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी केला.
मुंबईच्या ज्या ज्या सखल भागांत पाणी साचते, त्या त्या ठिकाणी वॉटर पंप आणि इतर आपत्कालीन साहित्य सज्ज ठेवल्याने मुंबईकरांनी चिंता करू नये, असा निर्वाळाही पालिकेने न्यायालयात दिला.
गेल्या वर्षी पावसाळ्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. यानंतर मुंबईतील मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसवण्यासंदर्भात व्यापारी संघटनेने न्यायालयात याचिका केली आहे. यावरील सुनावणीदरम्यान पालिकेने वरील दावा केला. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे पावसाळ्यातील उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. पुढील सुनावणी 18 जुलैला होणार आहे.
पालिकेचा दावा
- सहा समुद्रकिनाऱ्यांवर 36 जीवरक्षक तैनात
- 688 धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटिसा
- 299 ठिकाणी दरडींच्या धोक्याची माहिती
- एक हजार 425 ठिकाणी संरक्षक जाळ्या
- पाणी तुंबू नये यासाठी पुरेसे वॉटर पंप
- सहा पम्पिंग स्टेशन्स पूर्णपणे कार्यरत
|