मुंबई - बिहार, उत्तर प्रदेशमधील जनतेला इतर राज्यांत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्याचा जाब तेथील नेत्यांना का विचारला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महाराष्ट्रातील गुन्हे वाढण्यात परप्रांतीयांचा हात असल्याचाही दावा त्यांनी केला.
राज यांनी उत्तर भारतीयांशी हिंदीतून संवाद साधला. मी येथे खुलासा करण्यासाठी आलेलो नाही. माझी भूमिका तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आलो आहे, अशा शब्दांत त्यांनी सुरवात केली.
महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर पहिला हक्क येथील तरुणांचाच आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. स्थानिकांना प्राधन्याचा मुद्दा हा जगभर असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. उत्तर प्रदेशने देशातील सर्वाधिक पंतप्रधान दिले, तेथे विकास झाला नाही, याचा जाब त्यांना विचारला जात नाही. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन झाले, त्या वेळी नरेंद्र मोदींना कोणी काही विचारले नाही. आसाममध्ये हिंसाचार झाला, त्यावर कोणी काही बोलले नाही. मुंबईत मात्र मी काही बोललो, की त्यावर गोंधळ माजविला जातो, असे त्यांनी सांगितले. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये कारखाने गेले पाहिजेत, अशी माझीही इच्छा आहे; पण तिकडून इकडे यायचं, हाच उद्योग सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधून दररोज ट्रेन भरून येतात आणि परत मोकळ्या जातात. मुंबईच्या क्षमतेवर या गर्दीचा परिणाम होत आहे, हे कोणी का लक्षात घेत नाही, असा सवाल त्यांनी केला.
|