
महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्य हीच काळाची गरज पक्ष ऐक्यात विलीन करणार; जोगेंद्र कवाडे
उल्हासनगर : महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्य हीच काळाची गरज असून त्यासाठी रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करून ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा.आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य अशक्य आहे.असे स्पष्ट करताना या दोन्ही नेत्यांमुळे ऐक्य झाल्यास पक्ष ऐक्यात विलीन करणार अशी ग्वाही आज पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उल्हासनगरात दिली.तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सत्तेतील 5 टक्के वाटा मिळाला नाही तर महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन नवीन समविचारी राजकीय पक्षांसोबत मोर्चेबांधणी केली जाणार असा इशारा देखील कवाडे यांनी दिला.
पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष व उल्हासनगरातील माजी नगरसेवक प्रमोद टाले यांच्या पुढाकाराने टाऊन हॉल मध्ये पक्षाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कवाडे बोलत होते.रामदास आठवले यांनी मोठ्या मनाने कोणताही अहंकार न बाळगता प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यावी.हमखास ऐक्याचा मार्ग मोकळा होणार असे कवाडे म्हणाले.
जर नवनीत राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर जातीय तेढ निर्माण करणारे राज ठाकरे यांच्यावर का नाही?ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही का?असा सवाल देखील प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही धर्मापेक्षा देशाचे संविधान सर्वात मोठे आहे.मात्र धर्मा-धर्मा मध्ये,जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा मनसे व भाजपा करीत आहेत.राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून देखिल भाजप सत्तेत न येऊ शकल्याने या पक्षाचे नेते अस्वस्थ झाले असून त्यामुळे भाजपकडून राज ठाकरे यांचा प्याद्या सारखा वापर केला जात आहे.राज ठाकरे यांनी अगोदर त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचावीत.जर त्यांनी त्यांची पुस्तके वाचली असती तर धार्मिक मुद्दे उपस्थित केले नसते अशी टीका कवाडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
देशात महागाई,बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.ही गंभीर समस्या सोडविण्यापेक्षा भाजप ही गैर भाजप राज्यात ईडी व गुप्तचर यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहेत असाही आरोप त्यांनी यावेळी केला.ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे या मरावर आपण ठाम असून जिथून ओबीसी निवडणूक येतात त्या जागा त्यांना सोडाव्यात असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे,आयोजक प्रमोद टाले,गणेश उन्हावणे,जगन सोनवणे,चरणदास इंगोले,रत्ना मोहोड,विलास राऊत,संतोष रोकडे, सुनील सोनवणे,पुष्पा ससाणे,उत्तम भंगाळे,देविदास निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Ramdas Athawale And Prakash Ambedkar Party Merge Jogendra Kawade Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..