मुंबई - राममंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो, मात्र नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय, यामुळे राममंदिर उभारण्यास विलंब होत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त करीत भाजपला घराचा आहेर दिला आहे.
स्वामी यांनी "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्वामी यांनी तासभर सुरू असलेल्या भेटीत राममंदिर उभारणीबाबत चर्चा केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 18 खासदारांसह रविवारी अयोध्या दौरा केला आणि राममंदिर उभारणीचा प्रश्न पुन्हा उचलून धरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राममंदिराबाबत उद्धव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून, उद्धव यांच्याबरोबर इतर घटक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करू. शिवाय राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राम जन्मभूमी येथील विवादित आणि अविवादित जमिनीचे राष्ट्रीयीकरण तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी केले होते, तसे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. यामुळे कोणाचीही परवानगी न घेता सदर जमीन मंदिर बनवायला देता येऊ शकते. राम जन्मभूमी न्यास समिती आणि विश्व हिंदू परिषद या दोन संस्थांना मंदिर बनविण्यासाठी जमीन देण्यात यावी. राममंदिरचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो. मात्र, याबाबत भाजप सरकारला आणि नरेंद्र मोदींना कोणीतरी चुकीचा सल्ला देत आहेत, असेही ते म्हणाले.
|