मुंबई : मुंबईमध्ये येत्या ४ ऑक्टोबरपासून केवळ इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातील आढावा बैठकीनंतर चहल यांनी ही घोषणा केली.
आयुक्त चहल म्हणाले, "येत्या ४ ऑक्टोबरपासून आम्ही मुंबईत ८ वी ते १२ चे वर्ग सुरु करत आहोत. या व्यतिरिक्तच्या वर्गांसाठी नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. शाळा सुरु करताना सरकारने यासाठी तयार केलेल्या एसओपींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल"
शिक्षण विभागानं चार दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबईतील शाळा कधी सुरु होतील याबाबत निर्णय झाला नव्हता. पण आज मुंबई महापालिका आयुक्तांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि निर्णय जाहीर केला. त्यामुळे पालकांचा संभ्रम दूर झाला आहे.
ऑनलाईन वर्गही राहतील सुरु
पाल्याला शाळेत पाठविण्याबाबत पालकांना समंतीपत्र द्यावे लागणार आहे. ज्यांना पाल्याला शाळेत पाठवायचे नसेल अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु राहातील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची खबरबदारी घेण्यात आली आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला दिली मान्यता
मागच्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले. विद्यार्थी मागच्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. १७ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचा मानस होता. पण तो निर्णय रद्द झाला होता. यानंतर आता बहुतांश ठिकाणी लसीकरण आता झालेलं आहे. शिक्षकांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने मुख्यमंत्र्यांकडे शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यभरातील शाळा सुरु होणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.