आरटीई प्रवेशाच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त

File Photo
File Photo

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशप्रक्रियेच्या तीन फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांत राज्यात 39 हजार 983 आणि मुंबई विभागात 4099 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात शिक्षण विभाग नापास झाल्याचा आरोप अनुदानित शिक्षा बचाव समितीने केला आहे.

आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत 10 जुलैला काढण्यात आली आणि प्रवेश घेण्याची मुदत 24 जुलैला संपली. तिसऱ्या सोडतीत मुंबईतील 824 विद्यार्थ्यांची निवड झाली; मात्र फक्त 246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुंबईत 7491 जागा असल्या, तरी तिसऱ्या सोडतीअखेर फक्त 3392 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे तब्बल 4099 जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यात एक लाख 16 हजार 808 जागा असताना 76 हजार 825 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे राज्यातील तब्बल 39 हजार 983 जागा रिक्त राहिल्या आहेत. 

आरटीई कायद्यानुसार समाजातील वंचित व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शाळांत प्रवेश देण्याचा उद्देश असला, तरी या प्रक्रियेत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी व सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. यंदाही सरकारच्या ढिसाळ कारभाराचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाल्यानंतरही अनेक शाळा प्रवेश देत नाहीत. त्यामुळे सोडतीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारने द्यावे, अशी मागणी अनुदानित शिक्षा बचाव समितीचे डॉ. सुधीर परांजपे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com