Sanjay Raut : सत्तेच्या बळावर सरकार पाडणे देशद्रोहच - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी साधला केंद्रावर निशाणा
Sanjay Raut
Sanjay Rautesakal

मुंबई : ‘‘राजकीयदृष्ट्या भविष्यामध्ये ज्यांचा त्रास होऊ शकतो अशा राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जातेय, असा घणाघाती आरोप करत सत्ता, पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडणे हा देशद्रोहच असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

तसेच पाकिस्तानला देशाच्या सुरक्षेची गुप्त माहिती पुरविणाऱ्या प्रदीप कुरुलकरला वाचविण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द केला का, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली. ते म्हणाले, ‘‘ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायदे केंद्र सरकारने निर्माण केले असून, त्याचा वापर राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जात आहे.

जे भाजपमध्ये जातात त्यांना वॉशिंग मशिनमध्ये धुवून घेतले जाते.’’ महाराष्ट्रातही हेच झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार नवाब मलिक १६ महिन्यांनी सुटले, पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते त्यांना भाजपने मंत्री केले.

देश हुकूमशाहीकडे चालल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याची टिमकी वाजवू नका. ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांसाठी केला जात आहे,’’ असे सांगत आणि तो देशद्रोहच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राजकीय विरोधकांना घेरण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायद्यांचा वापर केला जात आहे. नुकतेच राज्यसभा आणि लोकसभेतून चार खासदारांना निलंबित करण्यात आले. हा कोणता कायदा आहे. सत्ता, कायदा हातात असणाऱ्यांनी राघव चढ्ढा, संजय सिंह, अधीर रंजन चौधरी आणि अन्य एकाचे निलंबन केले. कोणालाही काढून टाकणे, आत टाकणे हे फक्त २०२४ पर्यंतच चालेल, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदी-शहा दिल्लीत राजस्थानचे सरकार पाडण्याचे षड्‍यंत्र रचत होते असा आरोप केला. याचा उल्लेख करत राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सत्ता, पैसा, ईडी, सीबीआय, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडली गेली.

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार येणार असे दिसते आहे. त्यामुळे त्यांनी केलेले विधान गंभीर आहे. राजकीय विरोधकांचे सरकार टिकू न देणे, व्यवस्थित चालू न देणे ही कोणती लोकशाही आहे, असा सवाल राऊत यांनी केला. अशाप्रकारे पैशाचा वापर करून सरकार पाडणे, पक्ष फोडणे हा देशद्रोहच असल्याचाही आसूडही त्यांनी ओढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com