लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नयेत; भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नयेत; भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर विचार करण्याचे मंत्रिमंडळाने ठरवले आहे. मात्र, जोवर कोरोनाचे वॅक्‍सिन येत नाही, तोपर्यंत शाळा महाविद्यालये सुरू करू नयेत, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच वॅक्‍सिन आल्यानंतर सर्वप्रथम ते विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.

लॉकडाउनच्या काळात शाळा महाविद्यालये बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण शहरी भागात 50 टक्के तर ग्रामीण भागात फक्त 35 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेले आहे. ही बाब लक्षात घेता यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठे होणार आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 ही दोन्ही क्‍लब करावीत. मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सुट्ट्या कमी कराव्यात. महापुरुषांच्या जयंतींनाही शाळा, महाविद्यालये चालू ठेवावीत. अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा, अशी सुचनाही पाटील यांनी पत्रात केली आहे.

वॅक्‍सिन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास पालकांचा विरोध आहे. डिसेंबर महिन्यात वॅक्‍सिन आल्यास जानेवारी पासून त्यावेळची परिस्थिती बघून शाळा, महाविद्यालये रीतसर सुरू करावीत. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वॅक्‍सिन देण्यात यावे, असेही त्यांनी पत्रान म्हटले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात अभ्यासक्रम भरून काढावा. तसेच सहामाही परीक्षा किंवा सत्र परीक्षा घेऊ नयेत. थेट वार्षिक परीक्षा आणि दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहील्या आठवड्यात त्यावेळची परिस्थिती बघून घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे 2020-21 च्या पहिल्या शैक्षणिक वर्षात राहिलेला अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये भरून काढण्यात यावा आणि पुढील शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात यावे, असेही पाटील यांनी सुचना केली आहे.

शाळा, महाविद्यालये सुरू करताना सर्वांशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करू नयेत. तोपर्यंत शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून वगळून फक्त वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com