मोठी बातमी : राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली, बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

मोठी बातमी : राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली, बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वाद निर्माण झाला.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांना प्रत्युत्तर दिले आहे. माजिद मेमन यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी न होण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. राज्यातील महविकास आघाडीचे सरकार केवळ भाजपच्या विरोधात अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आपला अजेंडा सोडण्याचा विषयच येत नाही. शिवसेनेचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. तो अजेंडा शिवसेना कधीही सोडणार नाही.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आलेले तिन्ही पक्ष हे भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. या तिन्ही पक्षांचा जो अजेंडा आहे तो वेगवेगळा आहे. यामध्ये शिवसेना आपला हिंदुत्वाचा अजेंडा कधीही सोडणार नाही. आमदार प्रताप सरनाईक यांनीच राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाल दास यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भूमिपुजन कार्यक्रमासाठी नियंत्रित करावे अशी मागणी केली होती. तसेच राम मंदिर निर्माण कार्यामध्ये शिवसेनेचे योगदान पाहता एका जुन्या रामभक्त शिवसैनिकाला राम मंदिर ट्रस्टवर नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

प्रताप सरनाईक यांनी भाजपवर राम मंदिराच्या नावावर राजकारण करण्याचा आरोप करत म्हटले आहे की, ज्यावेळी देशातील सर्व सिंह बिळात लपून बसले होते त्यावेळी शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीमुळे राम मंदिर कार्य मार्गी लागले, त्यामुळे राम मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टने सन्मानाने मुख्यमंत्री उद्धार ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाच्या कामासाठी निमंत्रण देणे आवश्यक आहे. राम मंदिर निर्माणासाठी एकाही नेत्याने एक रुपयाही दिला नव्हता, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम राम मंदिर ट्रस्टला देऊ केली आहे. राम मंदिरासाठी जे शिवसेनेने केले आहे ते इतर कोणीही केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सन्मानाने निमंत्रण पाठवणे आवश्यक आहे.
दरम्यान, शिवसेना नेता संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला भूमिपूजनला नक्की जाणार. या संपूर्ण विषयाशी शिवसेनेचे भावनिक, राष्ट्रीय, धार्मिक नातं कायमच जोडलेले आहे.

काँग्रेसची सावध भूमिका
काँग्रेसने या विषयापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे राम दर्शनासाठी अयोधेयला गेले. त्यावेळी काँग्रेसचे नेते मंत्री सुनील केदार देखील सोबत होते. आज तेच सुनील केदार म्हणतायत ‘मुख्यमंत्र्यांचा निर्णय जो असेल त्यावर आम्ही बोलणार नाही. राम मंदिर हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील म्हणाले आहेत की, हा मुख्यमंत्रयांच्या श्रद्धेचा विषय आहे.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com