गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव : उद्धव ठाकरे

shiv sena leader uddhav thackeray statement after devendra fadnavis press conferenceq
shiv sena leader uddhav thackeray statement after devendra fadnavis press conferenceq

मुंबई : गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचा दुसरा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यात त्यांनी फडणवीस यांना अनेकदा टोले लगावले. ठाकरे म्हणाले, "फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत अचाट कामे केली असल्याने मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत पाच वर्षे राहिलो नसतो, तर त्यांना करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे. पहिल्या प्रथम कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा दाखला देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला, पण जनतेला सर्व माहीत आहे, की कोण खोटे बोलतेय आणि आमचे काय ठरले होते याला सर्व साक्षी आहेत. लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते.'' 

युती तुटलेली नाही, चर्चेचे दरवाजे खुले : फडणवीस 

ठाकरे पुढे म्हणाले, की मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. खोटे बोलण्याचा हिशेब काढला, तर अच्छे दिन, नोटाबंदीपासून कोण खोटे बोलले हे दिसेल. विधानसभेसाठी मी 124 जागा स्वीकारल्या. भाजपने जिंकणाऱ्या जागा स्वतःकडे ठेवून हरणाऱ्या जागा मला दिल्या. लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली त्याचा आनंद होता. मात्र जे झाले गेले ते आता न साफ केलेल्या गंगेला मिळाले. गंगा साफ करताना यांची मने कलुषित झाली. यांच्या मनात सत्तेची लालसा इतक्‍या स्तरावर जाईल याची कल्पना नव्हती. 

खोटेपणाशी नाते नको... 
बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री आमचेच सरकार येणार म्हणत आहेत. त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावे. त्यांनी आमच्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी तीन तीन वेळा बोलण्याचा आरोप केला. तुम्ही आमच्यावर काय पाळत ठेवत होतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला. मी अजूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा केलेली नाही. खोटेपणासोबत मला कोणतेही नाते ठेवायचे नाही, असे सांगून यापुढे भाजपसोबत चर्चा होणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com