राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

मुंबई -  बिहारमध्ये करोना संपलाय का, सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसे जाहीर करा,” अशी मागणी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. “हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असे त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

बिहार विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. याविषयी राऊत यांनी निवडणूक घेण्यावरच आक्षेप घेतला आहे. यावेळी राऊत यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले , “लालूप्रसाद यादव इस्पितळात आहेत. काँग्रेसचे तिथे फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे. पण लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे,” असं मत ही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

“बिहारमध्ये कृषी आणि कामगार बिलाचा काही फरक पडणार नाही. तिथे फक्त जात आणि धर्म हा मुद्दा असून अनेकदा गरीबी हादेखील मुद्दा नसतो. नितीश कुमार २४ वर्ष तिथे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी सुप्त राग असल्याचं दिसत आहे. समोर विरोधी पक्ष किती ताकदीने उभा राहतो यावर सर्व अवलंबून आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
 
मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं असं विचारावं लागेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “सीबीआय कुठेच दिसत नाही त्यामुळे तपास पुढे जाईल असं वाटत नाही. मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता मुंबई, महाराष्ट्राच्या लोकांना बिहारच्या पोलिसांना, तेथील राज्यकर्त्यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. “बिहार निवडणुकीत सुशांत सिंह प्रचाराचा मुद्दा असावा म्हणूनच तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून राजकारण केलं. जेडीयूने आतापासूनच सुशांतच्या नावे पोस्टर छापून प्रचारात आणले आहेत. विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कामासंदर्भातील मुद्दे नाहीत, सुशासन नाही म्हणून मुंबईतील मुद्दे प्रचारात आणले आहेत. तेथील राज्याच्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदे ओढण्याचं काम केलं. सुशांत सिंह प्रकऱणात हे सर्व आधीच ठरलं होतं, त्याप्रमाणे नाट्य पुढे चाललं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ड्रग्ज प्रकरणी सुरु असलेल्या तपासावर बोलताना ते म्हणाले की, ‘एनसीबीचं काम देशातील रॅकेट उद्धवस्त करणं आहे. देशाच्या सीमांवर जे हजारो कोटींचे अंमली पदार्थ येत आहेत हे सगळं संपवणं आहे. पण आज एका एका व्यक्तीचा तपास करत आहेत. यासाठी प्रत्येक शहरात एक वेगळा विभाग असतो. सुशांत प्रकरणात सीबीआयच्या हाती काही लागत नाही हे झाल्यावर एनसीबीचा तपास सुरु असेल. तपास होणं गरजेचं आहे. म्हणजे एकदाच काय ते संपवून टाकू”.

महापालिका कारवाई प्रकरणी प्रतिवादी करण्यात आल्यासंबंधी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “माझी काही बाजूच नाही तरीपण मांडेन. जी कारवाई झाली ती बेकायदा बांधकामावर आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. आम्ही फक्त वक्तव्य करुन लोकांना जागरुक केलं. कोणीतरी मुंबईत राहून पाकिस्तान म्हणतंय; शिवेसना, पालिकेला बाबर सेना म्हणणं महाराष्ट्राच्या अस्मितेला धोकादायक होतं”.

( संपादन - सुमित बागुल ) 

shivsena mp sanjay raut on sushant sing rajput case bihar election and politics

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com