सध्याची लाट थांबवण्यासाठी काही काळ कडक निर्बंध लादावेच लागतील - मुख्यमंत्री

Uddhav Thackarey
Uddhav Thackarey

मुंबई : आत्ता या क्षणी राज्यात असलेल्या कोरोनाच्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला काही काळासाठी का होईना कडक निर्बंध लावावेच लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. रविवारी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं. मात्र, यावेळी लॉकडाउनबाबत कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यासंदर्भात आता सोमवारी देखील आणखी एक बैठक पार पडणार आहे. टास्क फोर्ससोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिव्हिरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. 

पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार

"आपण आता लसीकरणात पुढे आहोत मात्र लसीकरणाची गती आणखी वाढवून आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊन आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्याचा प्रयत्न करु. कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती आपण परत एकदा पंतप्रधान मोदींकडे करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

एसओपी तयार करण्याचे काम सुरु  

गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

रेमडिसिव्हिरचा अवाजवी वापर थांबवा    

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्यावर चर्चा झाली. रेमडिसिव्हिरचा अति व अवाजवी वापर थांबविणं देखील गरजेचं आहे, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केलं. यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी अ[पण रेमडिसिव्हिरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडिसिव्हिरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाल्याची माहिती दिली.  

टास्क फोर्सने दिल्या सूचना  

९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावेत. डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत. तरुण रुग्णांना देखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे, त्याचं नियोजन करावं. ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त देऊ नये. यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदी सूचना करण्यात आल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com