मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करा, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी दिले.
काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी-निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त देतात; परंतु पनवेल व भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रुजू झालेले नाहीत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी गुरुवारी (ता.27) रुजू न झाल्यास त्यांना त्वरित निलंबित करावे आणि त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले. पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव या महापालिकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे.
|