मुंबई - चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील तांबी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पुलाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर व चिपळूण तालुक्यातील रस्ता व पुलांची झालेल्या दुरवस्थेबाबत सदानंद चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाअंतर्गत पाच हजार पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आरवली-माखजन या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
|