तापमान 35 अंशांवर; तीन अंशांनी घट
मुंबई - सोमवारी तापमानाचा उच्चांक गाठलेल्या उकाड्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर थोडासा दिलासा दिला; मात्र सोमवारच्या उकाड्याचा प्रभाव दिवसभर जाणवत होता. तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तीन अंशांनी घट झाली होती.
गुजरात येथील कच्छ आणि राजस्थानहून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी राज्यातील बहुतांश भागांतील पारा चढता ठेवला आहे. दोन दिवसांतील कोकण किनारपट्टीवरील तापमानाच्या वाढीची नोंद विशेषत्वाने घेतली जात आहे. मुंबईचा पारा सरासरीच्या तीन-चार अंशाने पुढे गेला असला तरी तुलनेने तो कमीच असल्याचे दिसत आहे. मुंबईत कमाल व किमान तापमानातील वाढ आणखी असह्य ठरेल. कमाल पारा मात्र फारसा वाढणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे.
कोकण वगळता मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पाऱ्याने चाळिशी पार केली. मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा आणखी काही दिवस राहतील, असा केंद्रीय वेधशाळेचा अंदाज आहे. देशभरातील पारा सरासरीच्या पुढे गेल्याचे केंद्रीय वेधशाळेकडून सांगण्यात आले. पूर्व भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर या भागांत तसेच राजस्थान, गुजरातेतील कमाल पाऱ्याच्या उसळीमुळे वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला आहे. याच भागांतून पूर्वेच्या दिशेने राज्यात वारे वाहत येत असल्याने राज्यातील उकाडा असह्य होत आहे.
मुंबईतील तापमानाचा अंदाज (केंद्रीय वेधशाळा)
तारीख - किमान - कमाल
29 मार्च - 22 - 36 अंश सेल्सिअस
30 मार्च - 22 - 36
31 मार्च - 22 - 36
1 एप्रिल - 21 - 35
2 एप्रिल - 21 - 34
3 एप्रिल - 21 - 34
|