अरबी समुद्रात वादळ; कमाल पारा 37 अंशांवर
मुंबई - मुंबईचा कमाल पारा सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी 37 अंश सेल्सिअसवर आला. दोन दिवसांच्या तुलनेत पारा काहीसा कमी नोंदवला गेला असला, तरी अरबी समुद्रातील "लुबान' या वादळामुळे मुंबईत उकाडा जाणवत असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली.
पावसाच्या गैरहजेरीमुळे यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा लवकरच बसत आहे, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जी. ए. कुलकर्णी यांनी सांगितले.
मुंबईत यंदा पावसाचे प्रमाण कमी दिसून आले. परिणामी, जमीन आणि समुद्राचे तापमान लवकर वाढल्याने सप्टेंबरमध्ये अरबी समुद्रात वादळाची निर्मिती झाल्याने यंदा ऑक्टोबरच्या सुरवातीलाच कमाल तापमान वाढल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये अरबी समुद्रात वादळाची निर्मिती होत नाही. सध्याच्या वातावरणात तयार झालेले "लुबान' वादळ दुर्मीळ असल्याचेही ते म्हणाले. परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर वाऱ्याचीही दिशा बदलते. या दिवसांत उत्तरेकडून वाहणारे वारे राज्यावर प्रभावी ठरतात. हे वारे उष्णता वाहून आणतात. हे सर्व घटक मिळून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईत कमाल तापमान 37 अंशांवर पोचले. मुंबईसह राज्यातील किनारपट्टीला तापमान वाढीचा अनुभव येत आहे. याचा जागतिक तापमानवाढीशी थेट संबंध जोडणे योग्य नाही, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
दोन दिवसांतील तापमानवाढीने 10 वर्षांतील ऑक्टोबरमधील कमाल तापमान दुसऱ्या स्थानावर होते; मात्र काही दिवसांत तापमान दोन अंशाने कमी होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
8 ऑक्टोबर - 37
7 ऑक्टोबर - 37.8
6 ऑक्टोबर - 37.2
अंदाज (अंश सेल्सिअस)
आज - कमाल - 37, किमान 26
उद्या - कमाल 36, किमान 25
|