ठाणे - आयुष्यात केवळ पैसे कमावणे हे जीवनाचे ध्येय असू शकत नाही. स्वत:चा उत्कर्ष साधतानाच समाजाचेही ऋण फेडता आले पाहिजेत. समाजातील विषमता दूर झाली, तरच देश खऱ्या अर्थाने पुढे जाईल. तीच खरी शाश्वत प्रगती ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
ठाण्यात सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी, पालक आणि देणगीदारांच्या मेळाव्यात काकोडकर बोलत होते. काकोडकर म्हणाले, 'आर्थिक कमतरतेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करण्याच्या हेतूने सात वर्षांपूर्वी ठाण्यात सुरू झालेली ही चळवळ आता राज्यभर फोफावते आहे. यंदा 25 जिल्ह्यातील 109 विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.''
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेनिमित्त शनिवारी ठाण्यात आलेल्या नागालॅंडचे राज्यपाल डॉ. पद्मनाभ आचार्य यांनीही संमेलनाला हजेरी लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, सेवा सहयोग फाउंडेशनच्या योजनेतून शिक्षण पूर्ण करून नोकरीवर लागलेल्या चार विद्यार्थ्यांनी आपले पहिले वेतन संस्थेला दिले.
|