जिल्हा परिषदेत अखेर लोकप्रतिनिधी!

जिल्हा परिषदेत अखेर लोकप्रतिनिधी!

ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर तब्बल साडेतीन वर्षांनंतर ठाणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या घोषणेने ग्रामीण राजकारणात ‘चैतन्य’ आले असून, इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्याचे १ ऑगस्ट २०१४ ला विभाजन झाल्यानंतर ठाणे जिल्हा परिषद भंग करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. ठाणे जिल्हा परिषदेच्या परिसरात कल्याण-डोंबिवलीजवळच्या २७ गावांचाही समावेश होता. या गावांमध्ये नगरपालिका स्थापनेची मागणी होती. कालांतराने नगरपालिका स्थापन झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागण्याच्या शक्‍यतेने २७ गावांमधून निवडणूकविरोधी सूर व्यक्त झाला; तर शहापूर, मुरबाडसह वासिंदसारख्या शहरीकरण झालेल्या गावांमधूनही नगरपालिकेची मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्काराची चर्चा सुरू झाली. 

अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय बहिष्काराचा निर्णय झाला. त्यानंतर लगेचच सर्वपक्षीय उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचे ठरवले. अखेरच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले; परंतु काही छोटे पक्ष आणि पत्रकार उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे जिल्हा परिषदेच्या चार गटांमध्ये व पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये निवडणूक झाली; पण अपुऱ्या सदस्यांमुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नव्हती. त्यानंतर सहा महिन्यांनंतर राज्य निवडणूक आयोगाने उर्वरित जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. त्याला काही राजकीय कार्यकर्त्यांचा विरोध होता. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यातून न्यायालयात अडीच वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पुन्हा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. आता साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात येणार आहे.

ग्रामीण राजकारणात ‘चैतन्य’
जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी १३ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या घोषणेने ग्रामीण राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मरगळ आलेल्या ग्रामीण राजकीय कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. गट व गण निश्‍चितीनंतर तयार झालेल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. आज सकाळपासून वरिष्ठ नेत्यांबरोबरच महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com