...तर भाजपनं 'त्या' आमदाराचा राजीनामा घेऊन दाखवावं - अस्लम शेख

टिपू सुलतान यांच्या नावावरुन सुरु झालेल्या वादावर अस्लम शेख यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय
Aslam-Shaikh
Aslam-Shaikh

मुंबई : टिपू सुलतानच्या नावाचा भाजपला खरंच एवढा विरोध असेल तर त्यांनी त्यांच्या विद्यमान आमदाराचा राजीनामा घ्यावा, ज्यानं टिपू सुलनातच्या नावाच्या रस्त्याला अनुमोदन दिलं आहे. या राजीनाम्यातून भाजपनं संपूर्ण देशाला हे सांगावं, असं आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपला केलं आहे. मालाड येथील क्रीडा संकुलाच्या नावावरुन भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले होते यावर भाष्य करताना त्यांनी भाजपला हा सल्ला दिला. (then take resignation of that BJP MLA Mumbai Aslam Sheikh challenge to BJP)

अस्लम शेख म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार जेव्हापासून सत्तेत आलंय तेव्हापासून लोकांना खूपच त्रास व्हायला लागला आहे. भाजपचा नगरसेवकच मुंबईतल्या रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव देतो. भाजपच्या एका विद्यमान आमदारानंही टिपू सुलतान यांच्या नावाच्या रस्त्यासाठी अनुमोदन दिलं आहे. पण मला आज वाईट वाटलं की, देवेंद्र फडणवीसांसारखा मोठ्या नेत्यानंही टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला. भाजप जर खरंच टिपू सुलतानच्या नावाला विरोध करत असेल तर या पक्षानं आपल्या त्या आमदाराचा राजीनामा घेऊन संपूर्ण देशाला सांगावं की, यानं टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला म्हणून आम्ही त्याचा राजीनामा घेतला. पण ते असं करणार नाहीत, कधीच करणार नाहीत. कारण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या काळात त्यांना याच साऱ्या गोष्टी दिसतात. पुन्हा पुन्हा फिरुन हे इथंच येतात. यावरुन आंदोलन करणाऱ्या भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना आजिबात हात लावू नका, असं मी पोलिसांना सांगितलं. कारण त्यांना भाजपनं द्वेष पसरवण्याचा आदेशच दिलाय तर ते तरी काय करणार?"

खेळाडूंना दिला सल्ला

शेख म्हणाले, "मालाडमधील या ग्राउंडच्या उद्घाटनाचा अनेकांना त्रास झाला. ते पण या संकुलाच्या टिपू सुलनात यांच्या नावामुळं. पण या संकुलाला गेल्या पंधरा वर्षांपासून टिपू सुलतानचं नाव आहे. इतक्या वर्षात इथं एकाही भाजपच्या खासदार आणि कार्यकर्त्याला हे माहिती नव्हतं, याचं मला आश्चर्य वाटतं. ज्या लोकांना नवं काही करायचं नाही, देशाला पुढे न्यायचं नाही. काही ना काही कारणानं ज्यांना समाजात फूट पाडायची आहे, अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. उलट जास्तीत जास्त अभ्यास करा, लिखाण करा, खेळा आणि जीवन जगण्याचा आनंद घ्या." या गाढवांच्या नादाला लागाल तर उगाचचं आपलं भविष्य खराब कराल. गटारीतून गॅस काढून जेवण बनवण्याच्या कल्पना तुम्हाला हे लोक देतील, नोकऱ्या देण्याचं काम करणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर तसेच भाजपवर निशाणा साधला.

मुंबईत लवकरच स्पोर्ट्स सीटी तयार होईल

मालाडच्या या क्रीडा संकुलात आम्ही क्रिकेटसाठी छोटं पीच, बास्केटबॉलचं ग्राऊंड बनवलं आहे. पुढील काळात या ठिकाणी स्केटिंगचंही ट्रॅक बनवणार आहोत. कारण मोठ्या क्रीडा संकुलांमध्ये पैसेवाल्या लोकांनाच जाता येत, गरीबांना नाही. त्यामुळं अशा क्रीडा संकुलांची गरज संपूर्ण मुंबईसाठी आहे. माझं एकच स्वप्न आहे मुंबईत प्रत्येक विभागात अशा प्रकारचं ग्राउंड असावं. यामुळं गरीबांना याची खंत वाटता कामा नये की, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला खेळता आलं नाही. अशाच मैदानांमधून तेंडूलकर, अझरुद्दीन, रोहित शर्मा सारखे खेळाडू तयार झाले आहेत. योगायोगानं खेळाचं खात काँग्रेसकडे असल्यानं मी मंत्री केदार, आदित्य ठाकरेंशी चर्चा केली आणि मुंबईत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खूप आहेत पण एखादी स्पोर्ट्स सीटी बनवयाला हवी, जिथं सर्व प्रकारचे खेळ खेळले जातील, अशी मागणी केली. येणाऱ्या काळात मुंबई उपनगरात अशा प्रकारची सीटी तयार होईल. आज खेळाची मैदानं नसल्यानंच मुलं चुकीच्या मार्गाला लागत आहेत, असंही यावेळी अस्लम शेख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com