प्लास्टिक ‘बंदी’ची वर्षपूर्ती; खरंच झालय प्लास्टिक बंद?

प्लास्टिक ‘बंदी’ची वर्षपूर्ती; खरंच झालय प्लास्टिक बंद?

मुंबई - पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर संपवण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेत कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले. या निर्णयाला आज (ता. २३) वर्ष पूर्ण होत आहे. प्लास्टिक हद्दपार होईल, असे सुरुवातीला वाटत असताना पदपथांवरील फेरीवाल्यांपासून दुकानांमध्ये पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याचे चित्र आहे. कारवाईचा धाक कमी झाल्याने प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. 

प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वर्षभरात एक लाख ७० हजार २६३ दुकाने, मॉल; तसेच मंडयांमधील गाळ्यांना भेटी दिल्या. त्यात ६२,८८६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला;  तर तीन कोटी २० लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. 

पालिकेने प्लास्टिकविरोधात जोरदार मोहीम हाती घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली. ही मोहीम ठोसपणे राबवण्यासाठी पालिकेचा परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभाग यातील २५० अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कारवाईसाठी २३ पथके सज्ज आहेत. वर्षभराच्या कालावधीत पालिकेने सुमारे तीन कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

निर्णय कागदावर
महात्मा फुले मंडई, भायखळा बाजार, दादर परिसरातील बाजारात फेरफटका मारला, तर सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्लास्टिकबंदी केवळ कागदावर असल्याचे दिसून येत आहे.

यंत्रणा अपुरी
मुंबई पालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा साठा आणि वापराविरोधात दुकानदार, गाळेधारक यांच्याविरोधात कडक कारवाई मोहीम हाती घेतली. बंदीनंतरही प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. कारवाईसाठी यंत्रणा अपुरी असल्याने योजनेचा परिणाम जाणवत नसल्याचे दिसते. 

विल्हेवाटीची प्रक्रिया सुरू 
२३ जून २०१८ पासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत त्यात ६२ हजार ८८६ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला; मात्र, आतापर्यंत जप्त करण्यात आलेला प्लास्टिकचा साठा महापालिका विभाग कार्यालयांच्या हद्दीतील गोदामांमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

प्लास्टिकबंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बाजारात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यावर कठोर कारवाई करण गरजेचे आहे.
- अभय डाके, ग्राहक 

पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकबंदीचा निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकारी करत नाहीत. भरारी पथकांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्लास्टिक उत्पादक कंपन्यांवर करणे आवश्‍यक आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिकचे उत्पादन होईल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुकुमार किल्लेदार, पर्यावरणतज्ज्ञ

कारवाई
साठा जप्त  - 
६२ हजार ८८६ किलो
दंड वसूल - ३ कोटी २० लाख रुपये  
धाडी - १ लाख ७० हजार २६३ 
दुकाने, मॉल्स; तसेच मंडयांमधील गाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com