अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण त्या वेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे, पण आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला, त्या वेळी डॉ. जितेंद्र आव्हाड बोलत होते.
जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जाती-धर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली. त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीबाईंनाच जाते. कार्ल मार्क्स यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते मीनल पालांडे, डॉ. अर्चना पवार, प्रा. नलिनी कुडूक, आरती प्रधान, श्रुतिका महाडिक, शीतल खरटमल, वर्षा मटकर, जयश्री रामाणे, प्रज्ञा गायकवाड, संगीता बामणे, विमल तांबे, कन्या खानविलकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, परिवहन सभापती विलास जोशी, माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक मनोहर डुंबरे, दिलीप बारटक्के आदी उपस्थित होते.
ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवले पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे, पण हे आरक्षण संपवणाऱ्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, असे आवाहनही डॉ. आव्हाड यांनी केले.