राज्यात ३६,२६५ नवे कोरोना बाधित
मुंबई, ता. ६ : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असून आज कालच्या तुलनेत तब्बल १० हजार अतिरिक्त रुग्णांची भर पडली. आज ३६,२६५ नवे रुग्ण आढळले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुणे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. असे असले, तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे. आज १३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १,४१,५९४ इतका झाला आहे. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली असून कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला आणि नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ठाणे ४, नाशिक १, पुणे १ आणि लातूरमध्ये दोन मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ६७,५७,०३२ झाली आहे. राज्यातील मृत्युदर २.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ८७,५०५ इतकी झाली आहे.
आज ५,३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६५,२४,२४७ इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.५५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात १३,७५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. १,३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.