युवक हाच समाजाचा महत्त्वाचा घटक
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : उद्याच्या समाजाचे नेतृत्व करणारा युवक हाच महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणून आपले विचार त्यांच्यामार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवकांना मार्गदर्शन करताना मांडले.
ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपालिका व १८ विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यात आली. आपल्या भागातील युवकांसोबत कसे काम करावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष शेख यांनी युवकांना केल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्ह्यात जोमाने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; तर समाज माध्यमातून युवकांनी समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत जिल्हा निरीक्षक अभिषेक बोके यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या खांद्यावर पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. समाजाचा विकास अधिक जलदगतीने करण्यासाठी युवक नक्कीच काम करतील असा विश्वास वाटतो. या बैठकीस ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, अनु आंग्रे, साजिद पटेल, आसिफ शेख, बिरू वाघमारे, प्रमोद सरोदे, प्रशांत नगरकर, विश्वास आव्हाड, नरेश साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.