‘मावळ्या’ने सर केली मोहीम
किनारी मार्गाच्या बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाच्या बोगद्याचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. ‘मावळा’ या टनेल बोअरिंग मशिनने वर्षभराच्या कालावधीत दोन किलोमीटर लांबीचा खोदून पूर्ण केला. प्रियदर्शनी पार्कपासून मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून हा बोगदा खोदण्यात आला असून तो जमिनीच्या १० ते ७० मीटर खालून गेला आहे.
११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्कपासून बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात झाली. १२.२० मीटर व्यासाचा हा बोगदा तीन मार्गिकांचा असणार आहे. हवा खेळती राहावी म्हणून बोगद्यात सकार्डो यंत्रणा वापरण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर चार मजली उंचीच्या टनेल बोअरिंग मशीनचे सर्व भाग सुटे करण्यात येणार आहेत. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूच्या प्रस्तावित बोगद्याच्या ठिकाणी आणण्यात येतील. तेथे पुन्हा हे भाग जुळवून खोदकामाला सुरुवात करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून बोगद्याच्या ब्रेक थ्रूची पाहणी केली. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, प्रमुख अभिनंता विजय निघोट उपस्थित होते.
----
मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
किनारी मार्ग हा मुंबईला गती देणारा प्रकल्प असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. किनारी मार्गाचे काम सुरुवातीला आव्हानात्मक वाटत होते; सर्व कर्मचारी, कामगार, अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करून मुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले. कोरोना, लॉकडाऊन, पूर आदी संकटे असताना कुठेही खंड पडू न देता उद्दिष्ट गाठल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दरम्यान, किनारी मार्गासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.