सायकलवरून चिमकुलीचा ३६३९ किमी प्रवास
ठाण्यातील दहा वर्षीय सई पाटील हिचा पराक्रम
ठाणे, ता. २२ (बातमीदार) : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवासासाठी निघालेल्या ठाण्यातील सई पाटील या दहा वर्षांच्या चिमुकलीने विक्रमी वेळेत ३६३९ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. सईला अवघ्या ३८ दिवसांत हा प्रवास पूर्ण करण्यास यश आले असून तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ठाण्यातील बाळकूम विभागात राहणारी जलपरी सई पाटील ही १० डिसेंबर रोजी तिचे वडील आशीष यांच्यासोबत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा सायकल प्रवास करण्यासाठी निघाली होती. १४ डिसेंबर रोजी तिने वैष्णवदेवी मंदिराच्या पायथ्यापासून आपल्या सायकल प्रवासाला सुरुवात केली. दररोज १२ तास सायकल प्रवास करून रोज ६० किलोमीटरचे अंतर ती पार करीत होती. पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुणे, गोवा, मदुराई, या भागातून येत असताना गावागावांतील शाळांमधून तिने ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ चा संदेश दिला. सईचा सायकल प्रवास पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वडील आशीष पाटील यांनी ठरवला होता, मात्र सईची मेहेनत आणि इच्छाशक्तीमुळे अवघ्या ३८ दिवसांत हा सायकल प्रवास पूर्ण करून चिमुकलीने विक्रम रचला आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार
गुरुवारी (ता. २०) भारताचे अखेरचे टोक असणाऱ्या कन्यकुमारी येथे पोहोचून सईने सायकल प्रवास पूर्ण केला. यावेळी तामिळनाडूचे आमदार आणि इतर अधिकाऱ्यांकडून चिमुकलीचा सत्कार करण्यात आला. सईने केलेल्या विक्रमाची नोंद लवकरच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये केली जाणार आहे.
सईला लहानपणापासून सायकलिंग आणि जलतरणाची आवड असल्यामुळे या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा सायकलप्रवास पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन महिन्यांचा कालावधी ठरवला होता, परंतु सईच्या जिद्दीने ३८ दिवसांतच हे अंतर पार करण्यात यश आले आहे.
- आशीष पाटील, सईचे वडील.