
भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून मुंबईत दाखल; राणे यांनी केले स्वागत
मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) अडकून पडलेल्या १८२ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने (Special flight) आज मुंबईत आणण्यात आले. रोमानियाहून (Romania) सकाळी ७.३६ वाजता विद्यार्थ्यांना घेऊन विमान झेपावले. भारतीय भूमीवर पाय ठेवताच त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
आम्ही काही दिवसांपासून आई-वडिलांशी मेसेजच्या माध्यमातून संपर्कात होतो. ज्या परिसरात अडकलो होतो, तिथे सुदैवाने कुठलाही स्फोट झाला नाही. युद्धजन्य परिस्थितीत होस्टेलखाली असलेल्या एका बंकरमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र राहत होतो. अशा भयावह परिस्थितीतून मायदेशी सुखरूप परतल्याचा आनंद आहे, अशा भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केल्या. आताही सीमेवर चार ते पाच हजार विद्यार्थी अडकले आहेत. साधारण आम्ही दहा किलोमीटरची पायपीट केली, असे अनेकांनी सांगितले.
१८२ विद्यार्थ्यांना विमानात जाऊन भेटलो तेव्हा ते भेदरलेल्या अवस्थेत होते. तुम्ही मुंबईत सुखरूप पोहचल्याचे सांगितल्यावर त्यांना दिलासा मिळाला. जास्तीत जास्त भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.