वसई : महापालिकेने (vasai municipal corporation) पाणी योजना राबवण्यासाठी नारळ फोडून उद्घाटन केले, त्यासाठी पाईपदेखील आणले; परंतु अद्याप पाण्याचा थेंबदेखील मिळत नाही. आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाण्याचे स्रोत (Dry well) आटले. खड्डे खोदून पाणी मिळवण्यासाठी (water scarcity) नागरिकांची धडपड सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण भटकावे लागते. हे विदारक चित्र आहे वसई तालुक्यातील. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या कामण, देवदळ, चिंचोटी, कोल्ही, सारजा मोरी व आजूबाजूच्या गावपाड्यांतील. त्यामुळे प्रशासनाच्या ढिम्म कारभाराबाबत (irresponsible Authorities) नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे
वसई पूर्वेतील कामण, देवदळ, चिंचोटी, कोल्ही, सारजा मोरी व आजूबाजूच्या गावपाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात पाणीटंचाईने कळस गाठल्याने ‘कुणी पाणी देईल का’, अशी हाक नागरिक मारत आहेत. या परिसराची लोकसंख्या सुमारे एक लाखाहून अधिक असून, ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता; मात्र त्यानंतर पालिकेत या गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेची लघुपाटबंधारे योजना बंद झाली. या ठिकाणी महापालिकेने पाणी योजना राबवण्यासाठी नारळ फोडून उद्घाटन केले, त्यासाठी पाईपदेखील आले; परंतु पाण्याचा थेंबदेखील मिळत नाही, असा आरोप येथील नागरिक करत आहेत.
तीव्र उष्णतेमुळे विहिरी कोरड्या झाल्या असून नदीपात्रदेखील सुकले आहेत. अशातच पाणी मिळवण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. एकाच ठिकाणी टँकर उभा करून पिंप भरून त्यातून पाणी कोसों मैल नेण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते; तर वसईच्या कामण नदीपात्रात जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदले जात आहेत, परंतु हे दूषित पाणी भरण्यासाठीही हंडे, कळशी घेऊन महिला येत आहेत; मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पत्रव्यवहार, पाठपुरावा दुर्लक्षित
पाणीपुरवठा योजना नेमकी कधी कार्यान्वित होईल याचा थांगपत्ता नाही. अशातच पाणी मिळेल या आशेवर चातकाप्रमाणे नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासंबंधी अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला असला तरी ग्रामस्थांना यश मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून आता पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरू लागली आहे.
महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली नाही. प्रशासन करवसुलीसाठी येते; मात्र मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. पाण्याची भीषण टंचाई असताना प्रशासनाने तातडीने पाण्याची व्यवस्था करावी; अन्यथा उद्रेक होईल. प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल.
- दिनेश म्हात्रे, माजी सरपंच, कामण
धरणात पाणी मुबलक आहे; मात्र त्याचा उपयोग नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना पाण्याच्या योजना नाहीत. अशातच टँकरने पाणीदेखील वितरित केले जात नाही. पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिकेने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा.
- प्रकाश म्हात्रे, ग्रामस्थ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.