चौपदरीकरणाऐवजी रस्‍त्‍याचे रुंदीकरण

चौपदरीकरणाऐवजी रस्‍त्‍याचे रुंदीकरण

चौपदरीकरणाऐवजी रस्‍त्‍याचे रुंदीकरण


सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या वडखळ ते अलिबाग रस्त्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. वडखळ ते अलिबाग हा दुपदरी रस्ता झाल्यानंतर २५ किलोमीटरचे अंतर फक्त १४ मिनिटात होणार आहे. रस्त्याचा अंतिम नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे. त्‍यानंतर लवकरच कामाची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेअंती दिली.
वडखळ-अलिबाग रस्‍त्‍याचा आराखडा १२ वर्षांत तीन वेळा बदलण्यात आला आहे. मात्र एकाही आराखड्यास अंतिम मंजुरी मिळू शकली नाही. आता निवडणुका जवळ आल्याने महामार्गाच्या कामाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदर जोड प्रकल्पाअंतर्गत आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वडखळ ते अलिबाग चौपदरीकरणाला मंजुरी मिळवली होती. मात्र, भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक अडथळे आल्याने चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले. अखेर त्यावर उपाययोजना करून चौपदरीकरणाच्या कामाऐवजी दुपदरी रस्त्याचे काम करण्याचे ठरले आहे. त्याचीच पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ९ः३० वाजता आ.जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांसह धरमतर येथील रस्त्याची व पुलाची पाहणी केली. तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड या ठिकाणातील स्थानिक शेतकऱ्यांशीही चर्चा केली.

रस्‍ता दुपदरी; पूल चौपदरी
धरमतर येथून रेल्वे मार्ग आणि जुना पूल यांच्यामध्ये असणाऱ्या जागेतून पुलाचे काम होणार आहे. भविष्याचा विचार करून, रस्ता दुपदरी असला तरी पुलाचे काम चौपदरी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी यांच्या समवेत चर्चा करून पुलाचे काम कशा प्रकारचे होईल, याबाबत जयंत पाटील यांनी माहिती घेतली.

वडखळ ते अलिबाग रस्ता चौपदरी केला होता, मात्र भूसंपादनाचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे आणि लोकांनी जमिनी देण्यास विरोध केल्याने दुपदरी रस्‍ता तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली आहे. मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात स्पॉट काढण्यात आले आहेत. नियोजन आराखडा पूर्ण झाला की १५-२० दिवसांत निविदा काढण्यात येईल. यानंतर खडतर प्रवासातून प्रवाशांची सुटका होईल.
- आमदार जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

चौपदरीकरणात भूसंपादनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे जुन्याच मार्गाच्या दोन्ही बाजूला रुंदी वाढवून १० मीटरची सिमेंट काँक्रिटची धावपट्टी करणार आहोत. रस्त्याची किंमत वाढत असल्याने पर्यायी नवा रस्ता तयार करण्यात येत आहे.
- लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com