समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

अमित गवळे, पाली
जैवविविधतेने नटलेले निसर्गसौंदर्य व २४० किमीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळली आहेत. वाढत्या उष्म्यामुळे बहुसंख्य पर्यटक अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, मुरूड, काशीद, किहीम येथील किनाऱ्यावर तसेच लगतच्या फार्महाऊसवर गर्दी करीत आहेत.
थंड-कोरडी हवा, समुद्राच्या लाटांवर स्‍वार होत स्‍पीड बोट, बनाना बोटीची सफर, साहसी खेळांबरोबरच नारळी-पोफळीच्या बागांमधील सुसज्‍ज फार्महाऊसला पर्यटकांकडून विशेष पसंत मिळत आहे. पुणे-मुंबईसह देशभरातील पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली असून बहुतांश समुद्रकिनारे बहरले आहेत. त्‍यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली राज्यमार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे.


साहसी खेळांची मजा
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरूड- काशीद, श्रीवर्धन-दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्र किनारे सध्या हाऊसफुल झाले आहेत. किनाऱ्यांवर बोटींग, घोडागाडी, बनाना, बाईक राईड, पॅराग्लायडिंगची मजा पर्यटक घेतात. सध्या या राईड्‌सचे दरही स्‍थिर आहेत.

फार्महाऊसला मागणी
शहरातील मंडळींना ग्रामीण भागात असलेले फार्महाऊस व ऍग्रो टुरिझमचे आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरण, शुद्ध हवेचा व सात्त्विक खाण्याचा ते आनंद घेतात. शिवाय काही काळ मोबाईल नेटवर्कपासून दूर गेल्याने रिफ्रेश होतात. स्विमिंगपूल असलेल्या फार्महाऊसला अधिक मागणी आहे. याबरोबरच चुलीवरचे जेवण, टेंट, कॅम्पेन आणि निसर्गसफर ट्रेकिंग आणि स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा आनंद पर्यटक असल्‍याचे सुधागड तालुक्यातील ठाकूर फार्महाऊसचे संचालक सुजित बारसकर यांनी सांगितले.

उन्हाळी सुट्यांमध्ये अनेकजण मित्रपरिवार व कुटुंबासमवेत निसर्गरम्य वातावरणात राहणे पसंत करतात. उष्म्यामुळे स्विमिंगपुलला पसंती आहे. येथे विविध एक्टिव्हटी घेतल्या जातात. स्थानिकांना रोजगार मिळतो.
- संतोष बावधाने, मालक, माऊंटन व्ह्यू फार्म अँड कॅम्पेन, गौळमाळ

उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटक इतरत्र फिरून समुद्रकिनारी राहणे व मजा करणे पसंत करतात. त्यामुळे समुद्रकिनारे फुलले आहेत. अनेकांनी आगाऊ बुकिंग केले आहे.
- मनीष पाटील, चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर

उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा योग्य दरात देण्यासाठी स्‍थानिक व्यावसायिक सज्ज आहेत. समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती मिळत आहे.
- अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com