उष्णतेच्या परिणामांची 
माहिती संकलित होणे आवश्यक

उष्णतेच्या परिणामांची माहिती संकलित होणे आवश्यक

मुंबई, ता. १३ : जागतिक हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा जैवविविधतेवर होणारा धोका वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध माहिती संकलित करणे, त्याबाबत प्रभावी उपाययोजना राबविणे शक्य होईल, असे मत उष्णलहरींबाबत आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत मांडण्यात आले. आयआयटी मुंबई येथे आयोजित उष्णतेच्या लाटांचे आव्हाने, त्याचे आरोग्यावरील परिणाम आणि उपाय याविषयावर आयोजित चर्चासत्रात विविध तज्ज्ञांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उष्णतेच्या कालावधीत अचानक वाढणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरुन उष्णतेचा घातक परिणाम शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होताना दिसत आहे. मृत्यूच्या कारणांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून उष्माघातावरील उपाययोजना आखण्यास मदत होणार असल्याचे डॉ. महावीर गुलेचा यांनी सांगितले. उष्णतेच्या लहरी अथवा उष्माघाताने होणारे मृत्यू हे पूर्वापार सुरू असून अलिकडेच त्याची अधिक गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे. जागतिक हवामान बदलामुळे उष्माघात वाढत असून मनुष्य व वन्यजीवांवर त्याचे परिणाम दिसत असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी मांडले. एनडीएमएचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयएमडीचे महासंचालक डॉ. अजित त्यागी, एनडीएमएचे सदस्य डॉ. कृष्णा वात्सा, सदस्य सचिव कमल किशोर, आयआयटीचे प्रो. कपिल गुप्ता, प्रो. महावीर गुलेचा, पब्लिक हेल्थचे सुरेश राठी आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
---
व्यापक जनजागृतीची गरज
उष्माघातामुळे आरोग्य, अर्थव्यवस्था, शिक्षण अशा विविध घटकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असून, उष्माघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनासह लोकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात मृत्यूची संख्या वाढू शकते. त्यासाठी शासनाने प्रबोधन व जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com