११० किलो वजनाच्या महिलेची यशस्वी प्रसूती

११० किलो वजनाच्या महिलेची यशस्वी प्रसूती

११० किलो वजनाच्या महिलेची यशस्वी प्रसूती
साडेतीन किलो वजनाच्या बाळाचा जन्म; कामा रुग्णालयात उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : राज्य सरकारच्या कामा व आल्बेस रुग्णालयात एका ११० किलो वजनाच्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. गंभीर परिस्थितीत असलेल्या गर्भवती महिलांना योग्य उपचार मिळाल्यास पुढील अडथळे टाळता येतात, याचाच प्रत्यय राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाच्या निमित्ताने कामा रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिला.
तब्बल ११० किलो वजन आणि प्रसूतीत गुंतागुंत असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला व तिच्या गोंडस मुलीला वाचवण्यात कामा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. जन्मलेल्या मुलीचे वजनदेखील ३.८ किलो असून बाळ निरोगी असल्याचे कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले; तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवशी या महिलेला व तिच्या गोंडस मुलीला वाचवण्यात यश आल्याने डॉक्टरांचे कौतुक करण्यात येत आहे.

असे झाले उपचार
भिवंडीतील एक महिला प्रसूतीसाठी आयजीएमसी भिवंडी रुग्णालयात दाखल झाली, मात्र प्रसूतीमध्ये गुंतागुंत आणि वजन तब्बल ११० किलो असल्याने डॉक्टरांनी तिला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात असलेल्या राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विशेष अशा कामा व आल्ब्लेस रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
या महिलेला प्रसूतीमुळे तातडीने कामा व आल्ब्लेस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या वेळी या महिलेला अस्वस्थ वाटत असून डोकेदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या महिलेचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर महिलेला रक्तदाब कमी होण्यासाठीची औषधे देण्यात आली. त्यानंतर महिलेची सोनोग्राफी आणि थायरॉईडची तपासणी करण्यात आली, असे डॉ. पालवे यांनी सांगितले.

सोनोग्राफीनंतर या महिलेचे बाळ स्थिर असल्याचे डॉक्टरांना अहवालामधून समजले. त्यानंतर या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर महिलेला रक्त चढविण्यात आले. त्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या महिलेला व तिच्या मुलीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या महिलेचा थायरॉइडचा अहवाल येणे बाकी आहे.
– डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस
भारत दरवर्षी ११ एप्रिल रोजी माता आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील माता मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस पाळतो. या दिवसाची सुरुवात व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) द्वारे करण्यात आली आणि २००३ मध्ये केंद्र सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com