राजकीय समीकरणांसाठी सत्तासंघर्षावरील निर्णय ऐतिहासिक!

राजकीय समीकरणांसाठी सत्तासंघर्षावरील निर्णय ऐतिहासिक!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच आता अंतिम टप्प्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) त्यावर निकालपत्र देण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातीलच नव्हे; तर देशातील राजकारणाची भविष्यातील समीकरणे ठरविण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

निकाल काय असेल याबाबत व्यक्त केली जाणारी पहिली शक्यता म्हणजे १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठविण्यात येऊ शकतो, असे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले. अशा वेळी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निर्णय घ्यावा की राहुल नार्वेकर यांनी हे न्यायालयाकडून स्पष्ट व्हावे लागेल, असे ते म्हणाले. राज्यपालांनी दिलेला बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला जाऊ शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. कदाचित न्यायालय स्वतःच यावर विशेषाधिकार वापरून निर्णय देऊ शकते. या व्यतिरिक्त संबंधित निकालपत्र एकमताने होण्याची शक्यताही कमी आहे, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा महाराष्ट्रासह देशाला आहे. हा निकाल भारतीय राजकारणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा असून भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा असेल, असे निवृत्त न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी सांगितले.

१६ आमदार अन्य कोणत्याही पक्षात गेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय दहाव्या सूचीनुसार त्यांना अपात्र ठरवू शकते. त्यांच्याबरोबर असलेले अन्य २४ आमदारही अपात्र ठरू शकतात. जर राज्यपालांचा बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला तर त्यापूर्वी असलेली परिस्थिती पुन्हा येऊ शकते आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे कायदेतज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांचे मत आहे.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकारचे सत्तांतर होण्याला जवळपास वर्ष होत आले असून सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी यासंदर्भातील सर्व याचिकांवर प्रारंभापासून सुनावणी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मागील वर्षभराच्या राजकीय घडामोडींवर या निकालपत्राचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. त्यामुळेच हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत कायद्याच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

घटनेनुसार आमदार अपात्र करण्याचा अधिकार विधिमंडळात आहे. तो पुन्हा विधिमंडळात येऊ शकतो का, हे या निकालाने स्पष्ट होईल. अनेक घटनात्मक मुद्दे असल्यामुळे न्यायालय काय निकाल देईल, हे पाहायला हवे.
- उज्ज्वल निकम

आमदार जरी अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहू शकतात. मात्र, त्यांना सहा महिन्यांत निवडून यावे लागेल. अर्थात यामध्येही कायदेशीर पेच आहे.
- ॲड्. असीम सरोदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com