

मुसळधार पावसामुळे
‘बेस्ट’चे नऊ मार्ग वळवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला. खबरदारीचा उपाय म्हणून ‘बेस्ट’ प्रशासनाने नऊ प्रमुख मार्गांवरील बस वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळवली, तर विक्रोळी भागात दुर्घटना घडल्याने एक मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मालाड सबवे, किंग्ज सर्कल, कुर्ला नेहरूनगर आणि वडाळा भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मालाड सबवेमध्ये पाणी भरल्याने पहाटे ४.२० वाजल्यापासूनच येथील बस मार्ग क्र. ३४५, २८१ आणि ४६० कांदिवली उड्डाणपुलावरून वळवण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता येथील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
माटुंग्यातील गांधी मार्केट आणि भाऊ दाजी लाड रोड परिसरात पाणी साचल्यामुळे किंग्ज सर्कल भागातून जाणाऱ्या बस मार्ग ६६, ५२१, ए-२२, ए-२५ यांसह अन्य बस सकाळी ६ ते ९.२० या वेळेत पर्यायी मार्गाने चालवण्यात आल्या. कुर्ला नेहरूनगर परिसरात पाणी साचल्याने बस क्रमांक ५९, ६० आणि ५८ ठक्कर बाप्पामार्गे कुर्ला स्थानककडे वळवण्यात आल्या होत्या.
विक्रोळीच्या प्रीमियम रोडवर भागात तीन ते चार झोपड्या कोसळल्याची दुर्घटना घडली. या आपत्तीमुळे खबरदारी म्हणून बस मार्ग क्रमांक ६०८ चा रस्ता सकाळी ६.३० वाजल्यापासून रात्री ९.१५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. याशिवाय प्रभादेवी, सांताक्रूझ, वडाळा आणि सीजीएस कॉलनी परिसरातही झाडे पडल्याने व पाणी साचल्याने वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली होती.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.