मुंबईकरांना पाण्याचे आयसोलेशन पडणार पथ्थ्यावर

मुंबईकरांना पाण्याचे आयसोलेशन पडणार पथ्थ्यावर

पाण्याचे ‘आयसोलेशन’ पथ्थ्यावर
महापालिकेकडून ३८ कामे युद्धपातळीवर पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे मोठे काम नुकतेच हाती घेण्यात आले होते. पाणीपुरवठाविषयक सुधारणेसाठी तसेच परिरक्षणाची कामे यानिमित्ताने करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या ४२ वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण प्लांटचे ऑपरेशन २४ तासांसाठी बंद ठेवले. पण या काळात कामाच्या निमित्ताने अनेक आव्हानांवर मात करत पालिकेने मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत केला. दरम्यानच्या काळात विभागाने एकुण ३८ कामे संपूर्ण मुंबईत हाती घेत ही कामे विक्रमी वेळेतही पूर्ण केली.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रातील अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेकडून ३० जानेवारीला हाती घेण्यात आले होते. भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसवणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे, दोन ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे अशी कामे या काळात पालिकेने हाती घेतली होती. त्यामुळे १४ विभागातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झाला होता. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे अतिशय विक्रमी वेळेत तसेच दिवसरात्र युद्धपातळीवर ही कामे पूर्ण करण्यात आली.

५०० कामगारांसह १०० अभियंत्‍यांची टीम कार्यरत
भांडुप ते बोरिवली यादरम्यान जवळपास १० किलोमीटर दुरून पाण्याच्या पाईपलाईनने भांडुप संकुलात पाणी येते. जल अभियंता विभागाकडून सकाळी १० वाजता या पाईपलाईनमधील पाणी काढण्यास सुरुवात झाली; पण पाण्याचे प्रेशर खूप असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत या पाईपलाईनमधून पाणीच संपत नव्हते. अखेरीस सातनंतर पाईपलाईनचे संपूर्ण पाणी रिकामे झाल्यानंतर या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. या मोठ्या कामासाठी पालिकेच्या ५०० कामगारांसह १०० अभियंत्यांची टीम कामाला लागली होती. या कामासाठी पालिकेने सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी अशा अधिकारी वर्गालाही मदतीला बोलावले होते. ४२ वर्षांत पहिल्यांदाच आयसोलेशन घेऊन मुंबईचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.


ही कामे केली पूर्ण
पाणीपुरवठा बंदच्या आयसोलेशनच्या कालावधीत पालिकेकडून एकूण ३८ कामे पूर्ण करण्यात आली. प्रत्येक मिनिटाच्या हिशोबाने ही कामे नियोजनबद्ध अशा पद्धतीने करण्यात आली. या कामांमध्ये ३ कामे ही जवळपास २०१२ पासून म्हणजे अकरा वर्षांपासून रखडली होती. या आयसोलेशनच्या कालावधीत बोरिवली, मालाड, वेरावले, वांद्रे या ठिकाणी छोटी छोटी कामे पूर्ण केली. त्यामध्ये पाण्याची गळती रोखण्यासाठीचीही कामे करण्यात आली.

४ फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने
मुंबईतील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा अतिशय सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती. ही तांत्रिक आणि परिरक्षणाची कामे योग्य पद्धतीने झालेली असली तरीही जल अभियांत्रिकीद्वारे दृष्टिकोनाद्वारे येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम तसेच पूर्व उपनगरातील एस, एन, एल या १२ विभागांचा पाणीपुरवठा बंद होता; तर जी उत्तर आणि जी दक्षिण विभागात काही परिसरात २५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com