शिमग्‍यापूर्वीच धूळवड

शिमग्‍यापूर्वीच धूळवड

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता शहरात बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामांमुळे चालकांची कसरत कमी झाली असली तरी या कामांमुळे रस्त्यांची धूळधाण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून, ही धूळ नाकातोंडात जात असल्याने नागरिकांनी संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. चालक, प्रवासी यांसह आसपासच्या रहिवाशांनाही याचा त्रास जाणवत असून, कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या हेच चित्र आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. रस्त्यांची कामे सुरू असल्याने सर्वत्र सिमेंट, खडी, मातीचा पसारा पडलेला आहे. रस्त्यांची कामे सुरू असल्याने सध्याच्या घडीला रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा तडाका वाढला असून वारा व वाहनांमुळे सिमेंट, माती हवेत पसरत आहे. अवजड वाहनांनी प्रवास केल्यानंतर ही माती मोठ्या प्रमाणात उडते. या धुळीने दुचाकी, रिक्षाचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्‍ताकामाच्‍या ठिकाणी टँकरने पाणीही मारले जात नाही. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मास्कशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे. तसेच दुचाकी, सायकलवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या कपड्यांवरही धुळीचा थर साचलेला दिसून येतो.
-----------------------------
दररोज मातीचा थर
रस्‍त्‍यावरील धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, घसा बसणे असे त्रास सुरू झाले आहेत. हा खोकला, सर्दी तीन ते चार दिवसांत बरी होत नसून दहा-पंधरा दिवस राहते. तर काहींना त्वचेचे विकार देखील जडत आहेत. सातत्याने धुळीतून प्रवास करावा लागत असल्याने हे विषाणूजन्य आजार बरे तरी कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यालगत असलेल्या गृहसंकुलातील नागरिक, दुकानदार यांच्याही घरात, दुकानात दररोज मातीचा थर जमा होत आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
---------------------------------------------
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामानिमित्त घराबाहेर दररोज माणूस पडतो. या रस्त्यावरुन जाताना अंगावर, डोक्यात पूर्णतः मातीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच अंगावर खाज येणे यांसारख्या समस्यांचा आम्‍हाला त्रास होतो.
- विश्वजीत पुराणिक, स्थानिक नागरिक
------------------------------------
रस्‍त्‍यांची कामे ही नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी योग्य आहेत; परंतु धुळीमुळे नागरिकांसह पक्षी, झाडांचेही नुकसान होत आहे. त्याचा विचार करणे गरजेचे आहे.
- प्राची कुलकर्णी, स्थानिक नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com