
रबाळेत ४१३ वाहनचालकांवर कारवाई
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : रबाळे वाहतूक शाखेने ऐरोली भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. यात ४१३ वाहनचालकांवर कारवाई करून २,५६,७५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) माईंड स्पेस कंपनी, ऐरोली सेक्टर-१९, २० दिघा, पटणी रोड, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ही धडक कारवाई केली.
वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार या कारवाईत नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन उभे करणाऱ्या १७० वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून सुमारे १,२९,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे सिग्नल तोडणाऱ्या १५ वाहनचालकांकडून ९,५००, तसेच वैध परवाना जवळ न बाळगणाऱ्या ३९ वाहनचालकांकडून २१,५०० रुपये, हेल्मेट परिधान न करणाऱ्या १२२ दुचाकीस्वारांकडून ६१ हजार, इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ वाहनचालकांकडून ३५,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कारवाई अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन रबाळे वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक गोपाळ कोळी यांनी केले आहे.