बैलगाडा शर्यतींचा तुरुणांमुळे थरार

बैलगाडा शर्यतींचा तुरुणांमुळे थरार

प्रमोद जाधव, अलिबाग
क्रिकेट, कबड्डी व मोबाईलमध्ये मग्न असणाऱ्या तरुण पिढीला पूर्वी बैलगाडीबाबत फारसे आकर्षण नव्हते. ‘बैलगाडी शर्यत नको रे बाबा’ असा कल असणाऱ्या या तरुणाई आता शर्यतीच्या मैदानावर जिवाची बाजी लावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, २० ते २५ वयोगटातील तरुणाईमध्ये बैलगाडा शर्यतीचा वाढणारी क्रेझ या खेळाचे महत्त्व अधिकच वाढवत आहे.
ः----------------------------------------
बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. पावसाळा संपल्यानंतर पूर्वी बैलगाडा शर्यत एक हौस, मौजमजा म्हणून गावोगावी चालू होत्या. साधारणः दहा ते बारा वर्षांपूर्वी ४० वयोगटापुढील मंडळीचा बैलगाडी शर्यतीमध्ये रस असायचा. छकडा तयार करण्यापासून बैलांची देखभाल करण्यापर्यंतची कामे ही मंडळी करीत होती. प्रेक्षकदेखील त्याच वयोगटातील होते. एक मनोरंजनाचे साधन म्हणून शर्यतीमध्ये पाहिले जात होती. त्यावेळी टाकी, बादल्या बक्षिसे ठेवली जात होती; परंतु गेल्या वर्षभरात बैलगाडा शर्यतीचा क्रेझ ग्रामीण भागांसह शहरी भागात देखील वाढू लागला आहे. पारंपरिक संस्कृतीचा वारसा व शेतकऱ्यांच्या आवडीचा छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालू होणाऱ्या या बैलगाडीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या शर्यतींमध्ये मालक व प्रेक्षक म्हणूनदेखील भूमिका बजावणाऱ्यांची संख्या तरुणाईची वाढत आहे. शर्यतीमधील व्यावसायिक दृष्टिकोन वाढत असून बैलांची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे, अशी अनेक कामे तरुणाई स्वतः करीत असून बैलांच्या किमतीदेखील प्रचंड वाढू लागल्या आहेत. तरीदेखील नोकरी व्यवसायात असलेल्या तरुणांची रुची वाढू लागल्याने खेळाचे भवितव्य उज्ज्वल आहे.
---------------------------
प्रतिष्ठेमुळे खेळात चुरस वाढली
पूर्वी हौस म्हणून बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतला जात होता. त्यावेळी सहा ते सातच स्पर्धक होते; परंतु आता बैलगाडा शर्यत हा मानाचा खेळ म्हणून समजला जात असल्याने या शर्यतींकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. जिंकण्याच्या ईर्षेमुळे बैलगाडा शर्यतीमधील चुरस वाढली आहे. त्यामुळे पूर्वी शर्यतींमध्ये विजेत्यांना स्टील टाकी, बादली आदी बक्षिसे दिली जात होती. मात्र, आता खेळाचे स्वरूप बदलले असून मोठ्या रकमेचे तसेच दुचाकी, टीव्ही अशा बक्षिसांची लयलूट केली जात आहे.
--------------------
मानवी सुरक्षेकडे दुर्लक्षामुळे अपघात
बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी २० ते २५ हजार प्रेक्षकांची गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्रच सध्या हा खेळ भरवला जात आहे. समुद्रकिनाऱ्यांसह भाटावर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये मानवी सुरक्षेकडे वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काही प्रेक्षकांना जीवदेखील गमवावा लागला आहे; तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी मानवी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
-----------------------
अनेकांना रोजगाराचे नवे साधन
बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी १० हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांची गर्दी होते. वेगवेगळ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांसह थंडपेय विक्रेत्यांना त्या दिवशी रोजगार मिळतो. छकडा तयार करण्यासाठी कारागिरांना रोजगार मिळू लागला आहे. छकडासाठी दोन-दोन महिने प्रतीक्षेत राहण्याची वेळ बैलगाडी मालकांवर येत आहे. तसेच शर्यतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांच्या किमतीही लाखांच्या घरात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बैलांच्या विक्रीतून आर्थिक मोबदला मिळू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com