शतपत्रांतून उलगडला स्‍त्रीयांच्‍या विचारांचा प्रवास

शतपत्रांतून उलगडला स्‍त्रीयांच्‍या विचारांचा प्रवास

गोरेगाव, ता. १४ (बातमीदार) : केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे महिला दिनानिमित्त आयोजित ‘स्त्रियांची शतपत्रे’ या कार्यक्रमातून दोनशे वर्षांपूर्वी स्‍त्रियांनी मांडलेल्‍या विचारांचा प्रवास मांडण्यात आला. लेखिका स्वाती कर्वे यांनी साधारणतः २०० वर्षांपूर्वी मासिके व वृत्तपत्रांत महिलांनी लिहिलेल्‍या पत्रांतून ‘स्त्रियांची शतपत्रे’ असा ग्रंथ लिहिला आहे. यावर आधारित हा कार्यक्रम होता. ही पत्रे सुमित्रा देवधर, दीपाली शहाणे, नेहा किणी, जान्हवी दरेकर व सागर रानडे यांनी अभिवाचनातून सादर केली. या कार्यक्रमाची संकल्पना, संपादन आणि दिग्दर्शन विलास पागार यांचे होते. तसेच निर्मिती सहाय्य देवेंद्र प्रभुदेसाई व निर्मितीप्रमुख सुनील देवधर यांनी केले होते.
स्त्रियांचे राजकीय, सामाजिक व संवेदनशील विचार अशा प्रकारांत याची मांडणी करण्यात आली होती. या वेळी ज्ञानप्रकाश, केसरी, ज्ञानोदय, स्त्री मासिक, आर्यभगिनी आणि रविवार सकाळ यामध्ये प्रकशित झालेली निवडक पत्रे वाचण्यात आली. त्या त्या काळातील स्त्रियांच्या व्यथा व विचार याद्वारे मांडण्यात आले. दरम्‍यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वाधार संस्थेच्या माजी उपाध्यक्षा वसुधा नेने यांच्या स्मरणार्थ वसुधा नेने साहाय्य फंड चालवले जात आहे. ज्यात गरजू महिलेला मदत केली जाते. या वेळी आस्मा शेख नामक एका युवतीला तिच्या पुढील शिक्षणाकरिता निधी देण्यात आला.

सावित्रीबाईंच्‍या पत्राने वेधले लक्ष
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या वाचनापासून करण्यात आली. या पत्रातून सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती दर्शवण्यात आली. हे पत्र सुमित्रा देवधर आणि दीपाली शहाणे यांनी सादर केले. यात समाजात कशाप्रकारे सावित्रीबाईंना मांग-महार समाजातील लोकांना तसेच महिलांना शिकवल्यामुळे जे टोमणे सहन करावे लागायचे याचा उल्लेख होता. तसेच आपण स्त्री शिक्षण आणि वंचित, शोषित समाजासाठी जे कार्य करीत आहोत, त्यात कितीही आडकाठी आली तरी आपण आपले कार्य असेच चालू ठेवायचे आहे, असे सांगण्यासाठी व ज्योतिबास धीर, आधार देताना सावित्रीबाई यांनी लिहिलेली ही पत्रे होती.

पत्रांचे मथळे
वर्णभेद, स्त्रिया सुशिक्षित असाव्यात, आंतर्जातीय विवाह, पुनर्विवाह, स्त्रियांचे कैवारी इकडे लक्ष देतील काय, विधवा स्त्रियांचे कुंकू, स्त्रिया व कुंकू, प्रापंचिक कामाचा मोबदला पत्नीला मिळावा काय, आत्ममंचांना कुणाची मुलीची की आई-बाबांची, एक पत्नीचा घातक कायदा असे या पत्रांचे सगळे मथळे होते. यानुसार असे कळून येत होते की रुढी-परंपरांच्या नावे स्त्रियांना कसे डावलले जात होते आणि बऱ्याच जणींना याची कल्पनादेखील नव्हती आणि ज्यांना कल्पना होती, त्यांचेदेखील रुढींच्या नावे कशाप्रकारे शोषण केले जात होते, अशी वस्तुस्थिती मंडण्यात आली. त्यामुळे शिक्षण हेच स्त्रीला समृद्धीकडे नेऊ शकते हेही पटवून देण्यात आले. यात अनेक पत्रे मिश्कील पण अचूक वर्णनावर मांडली गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com