मिरा-भाईंदरच्या ई बससाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त

मिरा-भाईंदरच्या ई बससाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मिरा भाईंदर महानगरपालिका खरेदी करत असलेल्या ई-बससाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त नक्की करण्यात आला आहे. महापालिका एकंदर ५७ ई बस घेणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कंत्राटदारासोबत सामंजस्य करार करण्यात आला असून कंत्राटदाराला निविदा स्वीकृती पत्रही देण्यात आले आहे. यातील ५७ बसपैकी काही बस १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ताफ्यात सामील करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसपैकी किमान पंचवीस टक्के बस इलेक्ट्रिक असल्या पाहिजेत, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार महापालिकेने ५७ ई बस परिवहन सेवेत सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मध्यम आकाराच्या साध्या ३२, मोठ्या साध्या १५ व मोठ्या वातानुकूलित १० बसचा समावेश आहे. या सर्व बस जीसीसी पद्धतीने चालविण्यात येणार आहेत. या पद्धतीनुसार सर्व ई बस कंत्राटदार खरेदी करणार आहे. बदल्यात महापालिका मध्यम आकाराच्या बससाठी प्रत्येकी ४५ लाख व मोठ्या बससाठी प्रत्येकी ५५ लाख रुपये अनुदान म्हणून देणार आहे. महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत २८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातून हे अनुदान दिले जाणार आहे. बस खरेदीसह बसची देखभाल दुरुस्ती, चार्जिंग केंद्र उभारणी, चालक ही जबाबदारी कंत्राटदाराची असून बसवरील वाहक व निरीक्षक महापालिकेचे असणार आहेत. तसेच तिकीट शुल्क वसुली महापालिका करणार आहे. बस चालवल्याबद्दल कंत्राटदाराला प्रत्येक मोठ्या बससाठी प्रतिकिमी ५४ रुपये, वातानुकूलित बससाठी प्रतिकिमी ५५ रुपये व मध्यम आकाराच्या बससाठी प्रतिकिमी ४६ रुपये अदा करण्यात येणार आहेत. हे दर इतर महापालिकांच्या तुलनेत कमी आहेत. हे कंत्राट बारा वर्षांसाठी देण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी दिली.
....
सध्या ताफ्यात ७४ बस
महापालिकेच्या ताफ्यात सध्या ७४ डिझेलवर चालणाऱ्‍या बस आहेत. या बसमधून दररोज ९० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात. महापालिकेकडून दिली जाणारी सेवा व बसची होत असलेली देखभाल दुरुस्ती यामुळे प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी सध्याच्या बस कमी पडू लागल्या आहेत. त्यातच शहरात नव्याने अनेक भाग विकसित झाले असून त्या ठिकाणी सेवा देणे आवश्यक बनले आहे. शिवाय शहरात लवकरच मेट्रो सेवा सुरू होत असल्यामुळे मेट्रो स्थानक ते शहरातील विविध भागातील रहिवासी संकुले या सेवा देखील महापालिकेला सुरू करायच्या आहेत. नव्या येणाऱ्‍या ई बसमुळे महापालिकेला हे शक्य होणार आहे.
..
नवीन येणाऱ्‍या ई बसमुळे प्रवाशांना जलद व दर्जेदार सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे. एक मे रोजी काही ई बस परिवहन सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न आहे.
- दिलीप ढोले, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com