पाण्यासाठी रात्रीचे जागरण

पाण्यासाठी रात्रीचे जागरण

घणसोली, ता. १८ (बातमीदार)ः गेल्या काही दिवसांपासून घणसोली विभागात पाणी समस्या बिकट झाली आहे. अवेळी पुरवठा होत असल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागत आहे. तसेच नोड परिसरात पाणी सध्या सुरळीत येत असून गावठाण भागात मात्र समस्या अधिकच बिकट असल्याने महिला वर्ग हैराण आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला आहे.
घणसोली गावात सध्या विविध समस्यांनी ठाण मांडले आहे. अनियमित वीजपुरवठा होत असल्याने घणसोलीकर आधीच त्रस्त असताना आता अनियमित, अत्यल्प पाणी पुरवठ्यामुळे महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या विभागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दोन वेळचे पाणीदेखील वेळेवर तसेच पुरेसे सोडले जात नसल्याची महिलांची तक्रार आहे; तर अनेक वेळा रात्री १२-१ च्या दरम्यान पाणी येत असल्याने दोन हंडे भरण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागे राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे किमान तीन तास पाणी सोडावे, अशी मागणी महिलांमधून होत आहे. तसेच रात्री-अपरात्री येणाऱ्या पाण्यामुळे दैनंदिन वेळापत्रकच बिघडले असल्याने किमान महापालिकेने पाणी सोडण्याची योग्य वेळ ठरवावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. १७) घणसोली गावातील महिलांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी पाच दिवसांत ही समस्या सोडवण्याते येईल, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.
------------------------------------------------
पाण्याअभावी भाडोत्रींची वानवा
पाणी पुरवठा अनियमित असल्याने घणसोलीत सध्या भाडोत्रीदेखील मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. अशातच गेल्या आठवड्यात घणसोली विभागात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने अनेकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे हक्काचे पाणीदेखील मिळत नसल्याने महिलावर्गात संतापाची भावना आहे.
----------------------------------------
घणसोली गावात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन वेळचे पाणीदेखील वेळेवर सोडले जात नाही. घणसोली गावातील पाणी पुरवठ्याची ही समस्या लवकरात लवकर सोडवली गेली नाही, तर नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात येईल.
- दिनेश म्हात्रे, शहरप्रमुख, आगरी सेना
----------------------------------------
घणसोली विभागातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत विभागाला सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर पाणी समस्या सोडवण्यासाठी उप-अभियंत्यांसोबत चर्चादेखील केली आहे.
- संजय तायडे, विभाग अधिकारी, घणसोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com