कुटुंबातील हरवलेला संवादामुळे घटस्फोटचे प्रमाण वाढले

कुटुंबातील हरवलेला संवादामुळे घटस्फोटचे प्रमाण वाढले

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३ : सोशल मीडियाने कुटुंबात सोशल डिस्टन्सिंग निर्माण केले असून कुटुंबातील संवाद त्यामुळे हरवला आहे. याचा परिणाम नातेसंबंधांवर होत असून अगदी क्षुल्लक कारणांमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. घटस्फोटांना जसे कुटुंब जबाबदार आहे, तसेच बदलती समाजव्यवस्थाही जबाबदार आहे. या सर्वांवर मात करायची असेल तर विवाहपूर्व समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. डोंबिवली महिला महासंघातर्फे ‘लग्न संस्था समाजाचा सक्षम पाया’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले.
डोंबिवली महिला महासंघातर्फे ‘नवविवाहितांमधील घटस्फोटांचे वाढते प्रमाण- कारणे आणि उपाय’ याविषयी संशोधनपर प्रकल्प हाती घेतला आहे. याला अनुसरून रविवारी डोंबिवलीतील विनायक सभागृहात ‘लग्न संस्था समाजाचा भक्कम पाया’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक प्रतिभा जगताप उपस्थित होत्या. त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती दिली. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाने कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे, ही चिंतनीय बाब असल्याचे जगताप यांनी सांगितले. व्यसनाधीनता, शारीरिक मारहाण, कुटुंबातील ज्येष्ठांची जबाबदारी, आर्थिक बाबी, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक संवाद, सोशल मीडिया आदी कारणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे जगताप यांनी सांगितले.
ॲड. मेघना आंबेकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भाविक छेडा आणि स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. मानसी करंदीकर यांच्याबरोबर आरती मुनीश्वर यांनी संवाद साधला. या परिसंवादात लग्न संस्था या विषयावर बोलताना बदलत्या कुटुंबव्यवस्थेवर आपली रोखठोक मते उपस्थितांनी व्यक्त केली. कुटुंबातील संवाद कमी झाला असून त्याला सोशल मीडियाचा अतिरेकी वापराने बळ मिळाले आहे. मुले-मुली लग्न करण्याविषयी उत्सुक नसतात. नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या संधी, त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या, तेथील स्पर्धात्मक वातावरण, स्वतंत्रपणे राहण्याची वृत्ती यामुळे तरुणाईला लग्न ही मोठी जबाबदारी वाटते. यात त्यांच्यावर जबरदस्ती करून लग्न केल्यास घटस्फोटांचे प्रमाण वाढते. अशाप्रसंगी मुला-मुलीचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही समुपदेशन करणे गरजेचे आहे. याबरोबरच लग्नाआधी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यावेळी महिला महासंघाच्या अध्यक्षा डॉ. विंदा भुस्कुटे, संस्थापक अध्यक्षा आणि कार्यवाह जयश्री कर्वे यांनी महिला महासंघातर्फे हाती घेतलेल्या या प्रकल्पात पुढे कशा पद्धतीने काम करण्यात येणार आहे याची माहिती दिली.

...तर प्रमाण कमी होण्यास मदत
कुटुंबात यांत्रिकपणा आला आहे. नवरा-बायकोचे नाते सांभाळणे हे जसे त्या दोघांवर अवलंबून असते, तसेच ते त्यांच्या कुटुंबावरही अवलंबून असते. दोघांनीही सामोपचाराची भूमिका घेतली आणि जबाबदारीचे समानपणे वाटप केले तर दुरावा निर्माण होणार नाही. पर्यायी घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल, असा सूर या परिसंवादात व्यक्त झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com