उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांची भटकंती

उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांची भटकंती

वाडा, ता. ९ (बातमीदार) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ‘आधार’ बंधनकारक केले आहे. आधार लिंक करताना विद्यार्थ्यांचे नाव, लिंग, जन्मतारीख अशा चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आता आगामी संचमान्यतेसाठी आधार क्रमांक आणि अचूक माहिती असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे; तरीही आधारची माहिती पूर्ण झाली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागत असल्याने शिक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.

विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानित शाळेतील शिक्षक नियुक्तीसाठी, शिक्षक अनुदानासाठी, तसेच इतर शैक्षणिक कामासाठी संच मान्यतेची गरज असते. सन २०२२-२३ या वर्षाची संच मान्यता आधार कार्डनुसार होणार असल्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालक सध्या आधार अपडेटसाठी धावपळ करत आहेत. नाव, लिंग, जन्मतारीख यामध्ये विद्यार्थी अवैध दिसत आहेत. ही कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्याप्रमाणे नोंदणी केल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या संकेतस्थळावर ती मुले अवैध दिसत आहेत. सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत; परंतु संचमान्यतेसाठी ‘आधार’ वैधता हा निकष लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी शिक्षक पालकांच्या दारोदारी फिरत आहेत.

राज्य सरकारने वाढत्या उष्णतेमुळे २१ एप्रिल २०२३ रोजी विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर पालक आपल्या मुलांसह गावी गेल्यामुळे आधार कार्ड अपडेटसाठी अनेक समस्या शिक्षकांसमोर निर्माण झाल्या आहेत. कारण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी स्वतः त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असणे अनिवार्य असल्यामुळे आधार कार्ड अपडेट केले जात नाही. काही पालक परिसरात आहेत, परंतु आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख बदलासाठी विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असून हे कागदपत्रे गावी असल्याचे सांगतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरच उर्वरित काम करावे लागणार आहे.

शिक्षण मानसिक तणावाखाली
सरकारने १५ मेपर्यंत अंतिम संचमान्यता देण्याचे आदेश दिले आहेत. ९५ टक्के आधार अपडेटचे कामे पूर्ण न झाल्यास मे २०२३ चे वेतन बिल स्वीकारले जाणार नाही, असे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे काही शिक्षक मानसिक तणावाखाली आहेत.

उन्हाळी सुट्यांमुळे मुले शाळेत येत नाहीत. आधार कार्ड वैधतेसाठी पालकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे असते. बऱ्याच पालकांमध्ये याबाबत उदासीनता असल्याने आधार कार्ड सुधारित करता येत नाही. त्यामुळे आधार वैधतेत अडचणी येत आहेत. सरकारने मे २०२३ चे वेतन देयके स्वीकारण्यास मनाई करण्याऐवजी शाळा सुरू झाल्यानंतर किमान दोन महिन्यांची मुदत आधार वैध करण्यासाठी देण्यात यावी.
- सुधीर घागस, प्रदेशाध्यक्ष, शिक्षण क्रांती संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com