विद्युत प्रणालीवर वाढतोय ताण

विद्युत प्रणालीवर वाढतोय ताण

खारघर, ता. १४ (बातमीदार) : काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकही घरातील वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे यांचा वापर अधिक करत आहेत. यात केबल, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे आदी विद्युत प्रणालीवर ताण वाढत असल्याने त्यामध्ये बिघाड होत आहे. परिणामी, वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी एसी, कुलर, पंखे यांचा वापर गरजेनुसार करावा; तसेच घर आणि कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा शक्यतो २४ डिग्रीच्या वर ठेवावे, असे आवाहन पनवेल तालुक्यातील खारघरमधील महावितरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मार्च महिन्यापासून उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होत आहे. या दोन महिन्यांत वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना उकाडा नकोसा झाला आहे. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर आणि कार्यालयात वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे यांचा वापर अधिक केला जात आहे. विजेच्या अधिक वापरामुळे खारघर वसाहतमधील केबल, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे आदी विद्युत प्रणालीवर ताण वाढला आहे. परिणामी, त्यात बिघाड होऊन वीजपुरवठाच्या खंडित होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून खारघर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. अनेकदा तर इमारतीमधील लिफ्ट बंद होत असल्याने रहिवाशांना पायऱ्यांचा वापर करावा लागत आहे. त्यात एप्रिल, मे महिन्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशा अनेक अडचणीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढणार हे महावितरण विभागाला माहिती असूनही योग्य प्रकारे उपाययोजना केली जात नाही. मात्र, नागरिकांना उन्हाळ्यात कुलर, पंखे यांचा वापर काटकसरीने वापर करावा, असे सांगून महावितरण विभाग हात झटकत आहेत. याविषयी खारघरमधील महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयात संपर्क केला असता, वाढत्या उष्णतेमुळे वीज वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा परिणाम वीज वितरण प्रणालीवर ताण येत आहे. केबल, ट्रान्सफॉर्मर व उपकेंद्रात कमाल मागणीमुळे विद्युत प्रणालीवर भार वाढत आहेत. परिणामी, बिघाड होऊन वीज खंडित होत आहे. तरी महावितरण वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. नागरिकांनी वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे यांचा वापर काटकसरीने करावा; तसेच वातानुकूलित उपकरणे शक्यतो २४ डिग्रीच्या वर ठेवून वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत खारघर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. खारघर शहराच्या लोकसंख्येत भर पडत असल्यामुळे विजेची मागणी वाढणार आहे. याकडे महावितरण विभागाने लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- दीपक शिंदे, पदाधिकारी, भाजप, खारघर

उपकेंद्र सुरू करण्याची गरज
तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपासून वसाहतीत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीसाठी महावितरणकडून उपकेंद्र उभारले आहे. हे उपकेंद्र सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे, असे तळोजा फेज दोनमधील नागरिकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com