खते, बियाणांची कमतरता भासू देणार नाही

खते, बियाणांची कमतरता भासू देणार नाही

पालघर, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास खते व बियाणांची पुन्हा मागणी करण्यात येईल. येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.
या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह, डहाणूच्या प्रकल्प अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा कृषी अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुपटीने वाढवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष द्यावे. एक रुपयात पिक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील भाजीपाला तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी भागात मोक्याच्या जागा उपलब्ध करून देण्याविषयी आराखडा तयार करावा. यामुळे नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भावही मिळेल. नागली, वरई व बांधावरील तूरीच्या उत्पादनावर भर देण्याची सूचनाही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली.

--------------------
हळद, सोनचाफा लागवडीवर भर
जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढवण्यावर कृषी विभाग भर देत आहे. जिल्ह्यात लागवडी खालील एकूण क्षेत्र एक लाख ४४ हजार ४२५ हेक्टर असून सर्वसाधारण खरीप हंगाम क्षेत्र एक लाख चार हजार ९६२ हेक्टर आहे. प्रमुख खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये भात पीक लागवडीचे क्षेत्र ७९ हजार ७६६ हेक्टर, नागली पीक लागवडीखालील क्षेत्र ११ हजार ९२३ हेक्टर, आणि वरई पीक लागवडीखालील क्षेत्र ८ हजार ४४८ हेक्टर तसेच कडधान्य पीक लागवडीखालील क्षेत्र सात हजार ६८१ हेक्टर, गळीत धान्य पीक लागवडीखालील क्षेत्र एक हजार ८८९ हेक्टर आहे. या प्रमुख खरीप पिकांसाठी तसेच इतर पिकांसाठीसुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com