दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक!

दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक!

फोटो आयडी

MUM23E19451


दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक!
राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन; ‘एबिलिम्पिक्स’मधील पदकविजेत्यांचा सत्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १८ ः समाजात अनेक प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांना निसर्गाकडून दिव्य गुणांचे सहावे ज्ञानेंद्रिय असते. समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. दिव्यांग व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्याच्या ऑलिम्पिक असलेल्या यंदाच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय ‘एबिलिम्पिक्स’ स्पर्धेत भारतासाठी पदक प्राप्त करणाऱ्या चार दिव्यांग युवक व युवतींचा रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १८) राजभवनात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
पुणे येथील बालकल्याण संस्थेच्या वतीने दिव्यांग पदकविजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या पत्नी या संस्थेच्या पदसिद्ध अध्यक्ष असतात.
प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल, हे पाहणे समाजाचे कर्तव्य आहे. आज तंत्रज्ञान तसेच बालकल्याणसारख्या सेवाभावी संस्थांमुळे अपंगत्वावर बऱ्याच प्रमाणात मात करता येते, असे राज्यपालांनी सांगितले.
आपण समाज कल्याण व सक्षमीकरण संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयक तयार केले होते, याचे स्मरण देऊन राज्यपालांनी दिव्यांगांना सन्मानाने जगण्यासाठी आपण यापुढेही शक्य तितके प्रयत्न करू, असे सांगितले. बालकल्याण संस्थेच्या कार्याचे तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. राज्यपाल रमेश बैस आणि रामबाई बैस यांनी संस्थेला भेट देऊन आम्ही दोघेही दिव्यांगांच्या गुणांचे प्रत्यक्ष अवलोकन करू, असेही जाहीर केले.
२३ ते २५ मार्च या कालावधीत फ्रान्समध्ये या आंतरराष्ट्रीय ‘एबिलिम्पिक्स’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते चेतन पाशिलकर (‘पेंटिंग व वेस्ट रियुज’मधील सुवर्णपदक), प्रियांका दबडे (एम्ब्रॉयडरी), भाग्यश्री नडीमेटला-कन्ना (टेलरिंग) व ओंकार देवरूखकर (पोस्टर डिझायनिंग ऑन कॉम्प्युटर) या दिव्यांग विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना या कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाही राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी संस्थेने आजवर विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामांची माहिती दिली.

सुविधा भारतात सर्वोत्कृष्ट
१९७८ मध्ये बालकल्याण संस्था पुणे येथील राजभवन परिसरात सुरू झाली. आजवर पाच हजार दिव्यांग विद्यार्थी व युवकांनी संस्थेतील सुविधांचा लाभ घेतला, अशी माहिती प्रतापराव पवार यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकल्याण संस्थेत उभारण्यात आलेल्या सुविधा भारतात सर्वोत्कृष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले.

फोटोओळ
मुंबई ः राज्यपाल रमेश बैस, रामबाई बैस आणि प्रतापराव पवार यांच्यासोबत पुरस्कारप्राप्त दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com